अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नागापूर परिसरात हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या वादातून तीन जणांनी चांगलाच गोंधळ घातला. दगडाने आणि धारदार शस्त्राने हल्ला केल्याने एक महिला जखमी झाली असून वाहन व दरवाजाची तोडफोड करून नुकसान केले आहे. जयश्री बाबासाहेब भाकरे असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ब्रिजेश राजेंद्र सुर्यनारायण (वय 26, रा. चेतना कॉलनी, साईराजनगर) यांनी शनिवारी (25 एप्रिल) रात्री दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्राम बापु कदम, किरण ऊर्फ डॉरिमॉन अशोक साळवे व बंटी शिंदे (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. नागापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. फिर्यादी ब्रिजेश सूर्यनारायण हे नागापूर भागात आपल्या चुलत मेव्हणा रमेश भाकरे यांच्या घरी हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रात्रीच्या वेळी ध्वनिक्षेपकावर गाणी सुरू असताना संशयित आरोपींशी वाद झाला.
या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संशयित आरोपींनी संगनमत करून शिवीगाळ करत दगड व धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाली. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. त्यानंतर काही वेळाने सम्राटनगर परिसरात संशयितांनी पुन्हा गोंधळ घातला. शिवीगाळ, दमदाटी करून वाहनाचे व लोंखडी दरवाजाचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. महिला पोलीस अंमलदार वंदना काळे तपास करीत आहेत.





