नाशिक | प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन-साधुग्राम परिसरातील सुमारे १८०० झाडे तोडण्याच्या प्रस्तावाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात शुक्रवारी (दि.१२) सुनावणी होणार आहे.
उन्हाळी सुट्ट्यांमुळे जवळपास दीड महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाकडे परिसरातील पर्यावरणप्रेमी आणि नाशिककरांचे लक्ष लागले आहे. साधुग्राम वृक्षतोडीच्या निर्णयाला विरोध करत मनसेचे शहर उपाध्यक्ष ॲड. नितीन पंडित यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सिंहस्थाच्या कामांसाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीचा निर्णय घेतल्याने पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
संपादकीय : १२ जून २०२६ – जलजीवन मिशनचे ‘कोरडेठाक’वास्तव
काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील हजारो झाडांची कत्तल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याला शिवसेनेसह पर्यावरणवाद्यांकडून जोरदार विरोध करण्यात येत असतानाही झाडे तोडण्याचा रेटा निर्दयी सरकारने लावून धरला. या विरोधात मनसे सरसावली असून तपोवनातील वृक्षांची कत्तल करू नका, अशी मागणी करत मनसे शहर उपाध्यक्ष ॲड. नितीन पंडित यांनी याचिका दाखल केली. तसेच स्थानिक रहिवासी मधुकर जगताप यांनीही याचिका दाखल केली.




