दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
दिंडोरी शहरासह तालुक्यात दोन दिवसांपासून वातावरणात बदल होवून उष्णतेमध्ये प्रचंड वाढ झाली असून दुपारी मात्र पावसाचे वातावरण होवून सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सप्तशृंग गड येथेही पावसाने हजेरी लावली आहे. सप्तशृंग गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी धावपळ झाली. या अवकाळी पावसाचा द्राक्ष, गहू, हरभरा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे तर जोपूळ यात्रेच्या उत्साहावर विरजण झाले आहे.
दिंडोरी शहरात विजेचा कडकडाट आणि वादळी वारा, पाऊस सुरुवातच विज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे एक तास वीजपुरवठा खंडीत झाल्याने दिंडोरी शहर पुर्णत: अंधारात होते,नंतर वीज पुरवठा सुरळीत झाला.
गेल्या पंधरा दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे हैराण झालेल्या दिंडोरीकरांना पावसाने जोरदार हजेरी लावून सुखद अनुभव दिला. दिंडोरी तालुक्यात विविध भागात दुपारी 5.30 वाजेच्या दरम्यान पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. अचानक आलेल्या सरींमुळे नागरिकांची धांदल उडाली. दिंडोरी, कळवण तालुक्यात काही ठिकाणी विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. त्यामुळे नागरिकांचे घरांचे पत्रे उडाले आहे. तर काही शेतकर्यांचे आंबे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
कळवण, दिंडोरी तालुक्यातही काढणीला आलेल्या उन्हाळी कांदा, टोमॅटो व इतर पिकांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे. पावसामुळे काढून ठेवलेला शेतातील कांदा झाकण्यासाठी कागद व ताडपत्री गोळ्या करण्यासाठी यावेळी शेतकर्यांची चांगलीच तारांबळ उडाली तर काही शेतकर्यांचा शेतातच कांदा भिजून नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्याचप्रमाणे काही शेतकर्यांचा द्राक्ष काढणीचे काम सुरु आहे. तसेच गहु काढणीचे काम सुरु आहे. काही शेतकर्यांनी सोंगणी करुन ठेवलेल्या गहुही भिजल्याने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाते की काय? अशा चिंतेत शेतकरी सापडला आहे.




