पुणे | Pune
केरळमध्ये (Kerala) ४ जून रोजी दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनने अत्यंत वेगाने वाटचाल करत शुक्रवारी (५ जून) गोव्यात अधिकृत आगमन केले आहे. सध्या मान्सूनने संपूर्ण दक्षिण गोवा (Gao) व्यापला असून पणजी, बंगळुरू आणि सालेमपर्यंत धडक मारली आहे. अरबी समुद्रात पोषक वातावरण असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत (४८ ते ७२ तासांत) मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
मान्सूनच्या आगमनापूर्वीच राज्यात पूर्वमोसमी पावसाने (Rain) जोर धरला आहे. पुढील पाच दिवस संपूर्ण कोकणासह पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीच्या ९० टक्के म्हणजेच सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२५ जिल्ह्यांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’
राज्यातील नागरिक कडाक्याच्या उन्हामुळे चांगलेच वैतागले असून पहिल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी आतुर झाले आहेत. पुढील दोन दिवसांत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. केरळपासून गोवा आणि मुंबईपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटक आणि केरळमधील काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळू शकतो. तर आज (दि.०६ जून) रोजी कोकण ते विदर्भातील २५ जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ईशान्य भारतातही पावसाचा जोर झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.




