नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
ओमानच्या समुद्रात भारतीय खलाशी असलेल्या जहाजांवर अमेरिकेने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे तीन भारतीयांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. या भीषण हल्ल्यानंतर या घटनेबाबत भारताने संताप व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून थेट अमेरिकेशी संपर्क साधून या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
ओमानच्या आखातात अमेरिकन लष्कराने ‘एमटी सेटेबेलो’ या व्यापारी जहाजावर केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय खलाश्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भारतात शोककळा पसरली असून केंद्र सरकारने यावर निषेध नोंदवला आहे. हल्ला झाला त्यावेळी या जहाजावर २४ भारतीय कर्मचारी होते. भारताच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यातील २१ जणांची सुटका करण्यात आली, तर मुख्य अभियंता पटनाला सुरेश , कॅडेट आदित्य शर्मा आणि फिटर शिवानंद चौरसिया यांचा मृत्यू झाला.
संपादकीय : १३ जून २०२६ – खांद्यावरील जू उतरले, पण व्यवस्थेचे काय?
अशा प्रकारची जीवघेणी कारवाई समर्थनीय नाही
एस. जयशंकर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली. आखाती भागात अमेरिकन नौदलाने केलेल्या हल्ल्यांमध्ये तीन भारतीय खलाशी मारले गेले, त्याबद्दल भारताचा तीव्र निषेध मी पुन्हा एकदा व्यक्त केला. व्यापारी जहाजांविरुद्धची अशा प्रकारची जीवघेणी कारवाई समर्थनीय नाही.
दरम्यान, या गंभीर परिस्थितीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणवर खापर फोडत एक नवा दावा केला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून बाहेर पडणाऱ्या भारतीय जहाजांवर इराणने केलेला ड्रोन हल्ला पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. हा हल्ला आम्ही हाणून पाडला. इराणने आपली वागणूक लवकरात लवकर सुधारावी, नाहीतर याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.




