अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
औद्योगिक क्षेत्रासमोर निर्माण झालेला गॅस तुटवड्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्रीय यांनी एकत्रितपणे गॅस वितरणातील त्रृटी दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
अहिल्यानगर तसेच जिल्ह्यातील अन्य औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस टंचाईमुळे निर्माण झालेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापौर ज्योती गाडे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, औद्यगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे स्थायी समितीचे अध्यक्ष सुभाष लोंढे भाजपाच्या उद्योग आघाडीचे अनंत देसाई, आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खताळ, बीपीसीएलचे मार्केटींग ऑफीसर मनोज जाधव, एलपीजीचे समन्वय अधिकारी सूर्यवंशी, एचपीसीएलचे ब्रजेशकुमार यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक असलेल्या गॅस पुरवठ्याचा आढावा घेतला. याबाबत उद्योजकांनी समस्यांची माहिती मंत्र्यासमोर मांडली. जिल्हा पुरवठा अधिकारी बडे यांनी केंद्र व राज्य सरकारकडून आलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे शैक्षणिक संस्था वसतिगृह औद्योगिक वसाहतीमधील कॅन्टीन यांना वितरीत करण्यात येणार्या गॅसची माहिती सादर केली.
बैठकीत उपस्थित असलेल्या उद्योजकांनी मांडलेल्या समस्यामध्ये प्रामुख्याने पीएनजी वाहिन्यांच्या जोडण्या होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. याबाबत मार्केटींग ऑफीसर मनोज जाधव यांनी 1 हजार 200 कनेक्शन आतापर्यत जोडले असल्याची माहीती दिली. सर्व उद्योजक कनेक्शन घेण्यास तयार असले तरी कंपनीकडे असलेल्या अपुर्या यंंत्रणेमुळे कनेक्शन जोडण्यात अडचणी असल्याचे निदर्शनास येताच मंत्री विखे यांनी सर्व कंपन्याचे करारनामे पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, मराठा चेंबर्सच्या किंवा औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयात स्वतंत्र यंत्रणा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. ज्या कंपन्यांना कनेक्शन दिले त्यांना तातडीने गॅस पुरवठा सुरू करण्याचे तसेच कंपन्याचे सहकार्य घेवून जोडण्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.
कंपन्यांशी झालेल्या कराराप्रमाणे वितरीकांच्या जोडण्या पूर्ण कशा होतील, यासाठी जिल्हाधिकार्यांनी स्वतः कंपन्याचे प्रतिनिधी उद्योजक यांचा समन्वय साधून या कामातील त्रृटी तातडीने दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याचे सुचित करून शहरातही चाळीस हजार घरगुती जोडण्या झालेल्या आहेत. मात्र, महापालिकेने वाढविलेल्या दरामुळे काम थांबल्याचे सांगण्यात आले. महापालिकेने याबाबत योग्य मार्ग काढावा, आशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी महापौर गाडे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष सुभाष लोंढे यांना दिल्या.
औद्योगिक वसाहतीमधील कॅन्टीन करता 50 टक्के गॅस उपलब्ध होणार असल्याने कामगारांना त्याचा दिलासा मिळेल. पाच दिवस काम सुरू ठेवण्याच्या निर्णयाबाबत उद्योजकांनी एकत्रित येवून निर्णय करावा. अनेक छोटे उद्योग मोठ्या उद्योगांना पुवरठा करतात. त्यामुळे कामगारांचे स्थलांतर होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी उद्योजकांच्या बरोबरीने प्रशासन सुध्दा तेवढी दक्षता घेईल. पाच किलो वजनाचे गॅस सिलेंडर उपलब्ध होत आहे. केरोसीनचा पर्याय सुध्दा उपलब्ध होत असल्याचे प्रशासानाच्या वतीने सांगण्यात आले. औद्योगिक वसाहतीमधील सर्व अतिक्रमण काढून टाकण्यासाठी प्रादेशिक अधिकारी राठोड यांनी पुन्हा सूरूवात करावी, अनेक टपर्यांमध्ये अवैध व्यवसाय सुरू आहेत. पोलीस प्रशासनाची मदत घेवून अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही करावी पुढच्या आठवड्यात आढावा घेणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.





