नवी दिल्ली | New Delhi
इराण-इस्रायल (Iran Israel Conflict) संघर्षात अमेरिकेने (America) उडी घेतल्यामुळे मध्य-पूर्व आशियासह आता संपूर्ण जगभरात तणाव निर्माण झाला आहे. यामुळे जगात तिसऱ्या महायुद्धासारखी परस्थिती उद्भवण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम तेलाच्या किंमतीवर झाला आहे. जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर दोन टक्क्यांनी वाढून गेल्या पाच महिन्यांमधील उच्चांकावर पोहोचले आहेत. यामुळे आशियाई देशांमधील शेअर बाजार गडगडले आहेत. तर इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम भारताच्या इंधन तेलावर होणार की नाही? याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना महत्त्वाची माहिती दिली आहे.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) म्हणाले की, “इराण-इस्रायल युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. जवळपास कच्च्या तेलाचा दर आता प्रति बॅरल $80 पर्यंत पोहोचला आहे. मात्र, याचा भारतावर काहीही परिणाम झालेला नसून, भारतातील लोकांना दिलासा मिळाला आहे. कारण, आजही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. भारत (India) पुर्णतः हॉर्मुझ सामुद्रधुनीतून येणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून नाही. भारतात विविध तेल आयातीचे स्रोत आहेत. सरकार भविष्यातील परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम आहे. त्यामुळे इंधन तेलाबाबत घाबरण्याचे कुठलेही कारण नाही”, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखाली सरकार सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहे. यात हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद होण्याच्या शक्यतेचाही समावेश आहे. आम्ही पुरवठ्याचे स्रोत विविध केले आहेत. भारत दररोज ५.५ दशलक्ष बॅरेल खनिज तेलाचा वापर करतो, त्यापैकी सुमारे १.५ ते २ दशलक्ष बॅरेल हॉर्मुझ सामुद्रधुनीतून येतात. तर इतर मार्गांद्वारे सुमारे ४ दशलक्ष बॅरेल आयात करतो. आपल्या तेल विपणन कंपन्यांकडे (Company) पुरेसा साठा आहे. त्यांच्याकडील बहुतांश साठा तीन आठवड्यांपर्यंत आहे. २५ दिवसांचा साठा आहे.तसेच इतर मार्गांद्वारे तेल पुरवठा वाढवू शकतो. आपण सर्व संभाव्य देशांशी संपर्कात आहोत. त्यामुळे याबाबत घाबरण्याचे काहीच कारण नाही”, असेही केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले.





