नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिका-इराण संघर्षात आता युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. इराणने अमेरिकेला १० कलमी प्रस्ताव ठेवून दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री, सय्यद अब्बास अराघची यांनी देखील एक्सवर पोस्ट करुन वृत्ताला दुजोरा दिला आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने निवेदन जारी करत अराघची यांनी दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करण्यात आल्याचे मान्य केले आहे.
सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली असून १० एप्रिल रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरु होईल. इराण आणि अमेरिका यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर आता भारताकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून अमेरिका-इराण शस्त्रसंधीचे स्वागत करण्यात आले आहे.
भारताकडून शस्त्रसंधीचे स्वागत
अमेरिका-इराण शस्त्रसंधीचे भारताकडून स्वागत करण्यात आले आहे. शस्त्रसंधीमुळं आखातात आता शांतता राहील, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच होर्मुझमधली वाहतूक पूर्ववत होईल अशी आशा आहे. आधीच युद्धामुळे खूप नुकसान झालेय. युद्धामुळे जगावर इंधनाचे संकट आले, असे भारताने म्हटले आहे. चर्चा आणि कूटनीतीनेच समस्यांवर तोडगा शक्य आहे, असेही भारताने म्हटले आहे.
भारताने पुढे म्हटले आहे की, या संघर्षामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. तसेच जगभरातील इंधन पुरवठा आणि व्यापाराची साखळी विस्कळीत झाली आहे. आता या युद्धविरामानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जहाजांची विनाअडथळा वाहतूक सुरू राहील. तसेच जागतिक व्यापाराचा प्रवाहही सुरक्षित राहील, अशी अपेक्षाही भापताने व्यक्त केली आहे.
भारतीय दुतावासाची ॲडव्हायझरी जारी
७ एप्रिलच्या ॲडवायजरीचा संदर्भ आणि अलीकडच्या घटना पाहता इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना दूतावासाचे मार्गदर्शन आणि सुचवलेल्या पर्यायांचे पालन करत लवकरात लवकर इराण सोडण्याचा सल्ला दिला जात आहे असे ॲडवायजरीमध्ये म्हटले आहे. त्या शिवाय दूतावासाच्या पूर्व परवानगीशिवाय कुठल्याही आंतरराष्ट्रीय सीमेवर जाण्याचा प्रयत्न करु नये असा सल्लाही देण्यात आला आहे.
कालही दिली होती ॲडव्हायजरी
७ एप्रिलला भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी एडवायजरी जारी केली होती. त्यात म्हटलेले की, इराणमधील भारतीय नागरिकांनी पुढचे 48 तास आहे तिथेच थांबावे. या दरम्यान वीज कार्यालयं, सैन्य संस्था आणि बहुमजली इमारतींच्या वरच्या मजल्यांपासून लांब रहा. घराच्या आताच थांबा. महामार्गावरुन फक्त दूतावासाच्या निर्देशानुसार आणि समन्वय साधूनच प्रवास करा असे स्पष्टपणे ॲडव्हायजरीत म्हटले होतं.





