अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अमेरिका-इस्त्राईल आणि इराण युद्धामुळे आखाती देशांमध्ये अनेक भारतीय अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यातील पाचजणांनी सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला असून यातील एकजण भारतात परतला आहे. तर उर्वरित चारजण आखाती देशातील हॉटेलमध्ये अडकले असले तरी सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
जिल्हा प्रशासनाने युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या नियंत्रण कक्षाला सोमवारी सायंकाळपर्यंत आखाती देशात वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये अडकलेल्या पाच जणांनी संपर्क केला आहे. यात कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील केदार केकान, नगर शहरातील बालिकाश्रम रोड येथील रुबीना खान, रियाज शेख, नसरिन शेख आणि कोल्हार खुर्द (ता. राहुरी) येथील गणेश लोंढे यांचा समावेश आहे.
यातील कोपरगावचा केकान हा सोमवारी सायंकाळी उशिरा अभुदानी येथून विमानाने मुंबईत परतला आहे, तर नगर शहरातील बालिकाश्रम रोड येथील तीन मुस्लिम व्यक्ती मक्का येथील हॉटेलमध्ये तर कोल्हार येथील लोंढे नावाची व्यक्ती सौदी अरेबियातील हॉटेलमध्ये अडकून पडलेले आहेत. हे सर्वजण सुखरूप हॉटेलमध्ये वास्तव्यास असून भारतात परतण्यासाठी विमान सेवेची वाट पाहत आहेत . या पाच जणांनी स्वतःहून जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधल्याने त्यांची माहिती समोर आली.




