
जळगाव | Jalgaon
जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा अमृत महोत्सवी (७५ वा वाढदिवस) सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या राजकीय प्रवासाचे आणि योगदानाचे मनापासून कौतुक केले. “महाराष्ट्रामध्ये भाजपची उभारणी करण्यात एकनाथ खडसे आणि स्व. प्रमोद महाजन यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. भाजप (BJP) कुणी उभा केला असेल, तर या दोघांचीच नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील,” अशा शब्दांत पवारांनी खडसेंच्या कार्याचा गौरव केला.
हे देखील वाचा : Eknath Khadse : “शरद पवारांनी साथ दिली नसती तर…”; आमदार एकनाथ खडसेंचे अमृत महोत्सवी सोहळ्यात विधान
दरम्यान, भाजपच्या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या असल्या, तरी शरद पवार यांनी खडसेंच्या राजकीय कारकिर्दीचा पट मांडत त्यांच्या भाजप उभारणीतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) योगदानाला अधोरेखित केले.
विधानसभेतील प्रभावी वक्ते
यावेळी पावर म्हणाले की,”१९६७ मध्ये मी पहिल्यांदा विधानसभेत गेलो. तेव्हापासून सभागृहात ज्या दोन नेत्यांची भाषणे माझ्या नेहमी लक्षात राहिली, त्यात एक खडसे आणि दुसरे आर.आर पाटील होते. त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रभावीपणे आपले मुद्दे मांडले. मंत्रिमंडळात काम करताना एकाच वेळी तब्बल १२ खाती अतिशय कार्यक्षमतेने सांभाळणारे नाथाभाऊ हे एकमेव मंत्री होते. या भागातील जनतेने त्यांना वारंवार निवडून देऊन विधानसभेत पाठवले आणि खडसेंनीही अनेक वर्षे प्रामाणिकपणे भागाची सेवा केली, असे त्यांनी म्हटले.




