अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
काँग्रेस पक्षाकडून मला विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी करण्याची कोणतीही सूचना नव्हती, असे स्पष्टीकरण श्रीरामपूरचे काँग्रेसचे नगराध्यक्ष करण ससाणे यांनी गुरुवारी (दि. 4 ) येथे दिले. श्रीरामपूर नगरपालिकेच्या आमच्या नगरसेवकांच्या आग्रहामुळे मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मला स्वतःलाही ही निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती, असेही ससाणेंनी आवर्जून स्पष्ट केले.
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत करण ससाणे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. ते श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष असतानाही त्यांनी या निवडणुकीत अपक्ष अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांना पक्षाद्वारे दुसरा अर्ज भरण्याचे व त्यासाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारीचा एबी फॉर्म देण्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, त्यास त्यांनी प्रतिसाद दिला नाही व अपक्ष अर्ज कायम ठेवला, अशी चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी उमेदवारी माघारीच्या अंतिम दिवशी त्यांनी त्यांचा अर्ज काढून घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी त्यांच्या उमेदवारीच्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण दिले.
आमच्या नगरसेवकांच्या आग्रहामुळे मी उमेदवारी अर्ज भरला होता. माझी स्वतःची ही निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. पक्षाकडे मी उमेदवारीही मागितली नव्हती. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही निवडणूक लढवण्यास सांगितले नव्हते. किंबहुना, त्यांच्याशी माझी या विषयावर चर्चाही झाली नाही. पक्षाकडून मला उमेदवारी करण्याबाबत कोणतीही सूचना नव्हती, असे ससाणे यांनी आवर्जून स्पष्ट केले. दरम्यान, त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे काँग्रेस पक्षात व महाविकास आघाडीत झालेल्या गोंधळाबद्दल बोलण्यास त्यांनी नकार दिला. त्या घटनांवर मी काहीच बोलू शकत नाही. मी फार छोटा कार्यकर्ता आहे, असे भाष्य त्यांनी यासंदर्भात केले.




