मुंबई | Mumbai
रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने अनेक राज्यात मनसे पक्षातर्फे ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सोमवारी मुंबईतील चेंबूरमध्ये मनसेतर्फे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
पक्ष फुटण्यावरुन शर्मिला ठाकरे यांनी भाजपला चांगलेच खडे बोल सुनावले आहे. तुमचे कार्यकर्ते फक्त दुसऱ्यांच्या सतरंजा उचलायला ठेवलेत का, इतरांचे पक्ष कशाला फोडता, असा खरमरीत सवालच शर्मिला ठाकरे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारला आहे.
पाच-सहा जण नव्हते, म्हणजे ते गेले असे नाही
शर्मिला ठाकरे यांनी भाजपकडून इतरांचे पक्ष का फोडले जातात, असा सवाल उपस्थित केला. ठाकरे गटातील काहीजण कालच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. पाच-सहा जण नव्हते, म्हणजे ते गेले असे नाही. बैठकीला हजर असलेले लोक जाणारच नाहीत, असंही मानायचं कारण नाही. मला याचा चांगला अनुभव आहे. माझ्या पक्षातील काही लोक जातील, असं वाटल्यावर मी त्यांना फोन करायचे तेव्हा ते म्हणायचे, ‘नाय वहिनी इकडेच आहे मी’, असे म्हणायचे. दुसऱ्याच क्षणाला ते चॅनेलवर दुसऱ्या पक्षात जाताना दिसायचे, असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.
दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा तुमची मुलं मोठी करा
भाजपला इतरांचे पक्ष फोडणे, एवढेच काम करायचे आहे. दुसरे पक्ष फोडा, त्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना. 12 वर्ष सत्तेत आहात ना, तर किमान स्वतःचे कार्यकर्ते मोठे करा. दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंपमध्ये चांगली मुलं आहेत, होती, त्यांनी दुसऱ्यांच्या सतरंज्याच उचलायच्या का? त्यांनी तिकडे ममता बॅनर्जींचा पक्ष फोडला, इकडे उद्धवचा आणि शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला. आम्ही पक्षातून बाहेर पडलो आणि आमचे नवीन कार्यकर्ते तयार केले, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले.
साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष वाटत मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. त्याबाबत बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, पण कसं माहिती आहे ही झाडं वाढायला 100 वर्ष लागतात. आम्ही लावू झाडं पण तुम्ही जी झाडं तोडताय ती 100-200 वर्ष जूनी आहेत. आम्हाला आणि त्यांनापण जो ऑक्सिजन लागतो तो याच झाडांकडून येतो. पावसाला उशिर झालाय, जमिनीतील पाण्याची पातळी तळाला पोहोचली आहे कोणाला काही पडलेली नाही. आम्हाला आमचे पैसे घ्यायचे आहेत, मुलं सगळी फॉरेनला जाऊन सेटल झाली आहेत. तुम्ही मरा इकडे सगळे.




