राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
शेतकर्यांना दिलासा देणे ही केवळ घोषणा नसून ती आमची बांधिलकी आहे. खरिप हंगामापूर्वी शेतकर्यांची कर्जमाफी करणार असून जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करतात, त्यांच्यावर अन्याय होऊ नये याचीही आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत. पुढील चार महिन्यांत महाराष्ट्रातील शेतकर्यांना दिवसा वीज आणि मोफत वीज देण्याचा शासनाचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिलांच्या सक्षमीकरणाबाबत बोलताना, लाडकी बहिण सारख्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत. काहींना वाटले की आम्हाला मोठे बहुमत मिळाल्यावर या योजना बंद होतील, या योजना कधीही बंद होणार नाहीत. त्या अधिक प्रभावीपणे सुरू राहतील.
लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी महिलांचा सहभाग वाढवणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मात्र, दुर्दैवाने काही राजकीय पक्षांनी सुरुवातीला समर्थन देऊन नंतर विरोध केला, ज्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय पूर्णत्वास जाऊ शकला नाही. हे अत्यंत खेदजनक आहे. आज आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 व्या जयंती वर्षात आहोत. त्यांनी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षण, स्त्रीसन्मान आणि सामाजिक न्यायासाठी जे महान कार्य केले, ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी समाजातील अनेक वाईट प्रथांना समाप्त करण्यासाठी लढा दिला आणि स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडली. आज आपली जबाबदारी आहे की त्यांच्या विचारांना पुढे नेणे, समाजात समानता प्रस्थापित करणे आणि प्रत्येक घटकाला न्याय देणे.
समुद्रात वाहुन जाणारे 75 टीएमसी पाणी अहिल्यानगर, नासिक व मराठवाड्याच्या प्रत्येक तालुक्यात पोहचवून दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न करणार असून मुळाधरणाचा गाळ उपासल्यास 3 टीएमसी आधिकचा पाणीसाठा तयार होणार आहे. त्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. राहुरी विद्यापीठाला भविष्यात लागेल एवढी जमिन ठेऊन उरलेली एक हजार एकर जमिन औद्योगिक वसाहतीसाठी घेण्यासाठी प्रयत्न करणार असून संरक्षण प्रकल्पासाठी या जिल्ह्यात जागा आपण देत आहोत. त्यामुळे या भागातील जवळपास 35 हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. या भागातील एसटी डेपो, रेल्वेप्रश्न अशा अनेक मागण्या आपण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.





