कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon
बुधवारी सायंकाळी कोपरगावातील धामोरी, मायगाव देवी परिसराला वादळी वार्यांसह झालेल्या पावसाने चांगलाच तडाखा दिला. यावेळी वीज पडून एक महिला दगावली तर गाय व म्हशीचा मृत्यू झाला. वादळी वार्यामुळे घरांची पडझड झाली. वीजेचे खांब वाकले, शेड व गोठ्यांचे नुकसान झाले. या घटनेमुळे कोपरगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
बुधवारी सायंकाळी कोपरगाव शहर व तालुक्यात सोसाट्याचे वादळी वारे वाहिले. परंतु सर्वाधिक फटका धामोरी व मायगाव देवी परिसराला बसला. मायगाव देवी येथे अचानक पाऊस सुरू झाला. यावेळी मीराबाई सुरेश थोरात (वय 62) ही महिला आपल्या शेतात काम करीत असताना अचानक वीज कोसळली. यात मीराबाई थोरात यांचा जागीच मृत्यू झाला. गुरूवारी कोपरगाव येथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.
मायगाव देवी येथीलच विश्वास कोंडाजी जाधव, सुभाष कोंडाजी जाधव यांची म्हैस वीज पडून दगावली. धामोरी येथे प्रकाश बळवंत कांबळे यांच्या घराजवळील लिंबाचे झाड वार्यामुळे पडून गाईचा मृत्यू झाला. याशिवाय सुदाम थोरात, सोमनाथ गाडे यांच्या शेडचे पत्रे उडाले आहेत. तसेच परिसरात 24 तासांपासून वीज गायब झाली होती. मायगाव देवी व परिसरात वीजेचे खांब वाकले आहेत, तारा तुटल्याने बुधवारी सायंकाळपासून वीज पुरवठा खंडीत झाला होता. गुरूवारी सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झालेला नव्हता.
बुधवारी झालेल्या वादळी वार्यात सांगवी भुसार येथील किसन कचरू पवार व गोरख कचरू पवार यांच्या घराची पडझड झाली. याशिवाय निलेश नारायण जाधव यांचे गोठ्याचे व अशोक दादा जाधव यांचे पोल्ट्रीचे नुकसान झाले आहे. विविध गावांत झालेल्या नुकसानीची माहिती संकलीत करण्याचे काम सुरू आहे. तलाठ्यांना माहिती कळविण्याच्या सुचना दिल्या आहेत.





