Monday, April 6, 2026
Homeराजकीय"योग्य वेळ आली की आम्ही लाडक्या बहिणींना…"; एकनाथ शिंदेंची सभागृहात मोठी घोषणा

“योग्य वेळ आली की आम्ही लाडक्या बहिणींना…”; एकनाथ शिंदेंची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर । Nagpur

राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आज (१० डिसेंबर) राज्य विधिमंडळात चांगलीच गाजली. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या योजनेत मोठा ‘घोळ’ झाल्याचा गंभीर आरोप करत सरकारला जाब विचारला. दुसरीकडे, सत्ताधारी पक्षाने विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढत, भविष्यात ‘लाडक्या बहिणीं’ना २१०० रुपयांची वाढीव मदत देण्याचे संकेत दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत सभागृहात एक महत्त्वाची घोषणाही केली.

- Advertisement -

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सध्या या योजनेतील लाभार्थ्यांकडून ‘केवायसी’ (KYC) प्रक्रिया पूर्ण करून घेतली जात आहे. मात्र, ही प्रक्रिया करताना महिलांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याव्यतिरिक्त, नियमांचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक ‘लाडक्या बहिणीं’ची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत, ज्यामुळे या योजनेबाबत राज्यात संभ्रमाचे वातावरण आहे.

या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सभागृहात सरकारला घेरले. त्यांनी या योजनेत मोठा घोळ झाल्याचा थेट आरोप केला. ‘आशा वर्कर’, ‘अंगणवाडी सेविका’ आणि ‘ग्रामसेवक’ यांना फॉर्म भरण्याचे ‘टार्गेट’ देण्यात आले होते. हे टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात या कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी ‘बोगस फॉर्म’ भरल्याचा दावा पटोले यांनी केला.

पटोले यांनी सरकारला स्पष्ट शब्दांत विचारले, “या गडबडीला कोण जबाबदार आहे? या योजनेसाठी वापरण्यात आलेले पैसे हे सरकारवर बसलेल्यांचे नाहीत. सत्तेत बसलेले मालक नाहीयेत. जनतेच्या पैशांचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल!” त्याचबरोबर, त्यांनी महिलांना २१०० रुपयांची वाढीव मदत कधी देणार, असा प्रश्नही उपस्थित केला.

विरोधकांनी उपस्थित केलेल्या या सर्व प्रश्नांना महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिले. त्यांनी ‘लाडक्या बहिणीं’च्या नावनोंदणीसाठी ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिले होते, तसेच ऑफलाईन पद्धतीनेही नावनोंदणीची सोय उपलब्ध होती, असे स्पष्ट केले. त्यामुळे या योजनेवरून कोणताही अनावश्यक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी सभागृहात केले.

यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना लक्ष्य करत जोरदार प्रतिहल्ला चढवला. “तुम्ही लाडकी बहीण योजनेवर बोलूच नये. तुम्ही या योजनेला विरोध केला होता आणि म्हणूनच विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला. आता जर तुम्ही आणखी या योजनेला विरोधच करत राहिलात, तर भविष्यातही ‘लाडक्या बहिणी’ तुम्हाला घरी बसवतील,” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधला.

यादरम्यान, पटोले यांनी विचारलेल्या २१०० रुपयांच्या वाढीव मदतीच्या प्रश्नावरही एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी सभागृहात सांगितले की, “योग्य वेळ आली की आम्ही ‘लाडक्या बहिणीं’ना २१०० रुपयांचा लाभही नक्कीच देऊ.” या विधानाने सरकार भविष्यात या योजनेत वाढ करण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत.

ताज्या बातम्या

Rahuri By Election 2026 : राहुरी पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट; प्राजक्त तनपुरेंची...

0
अहिल्यानगर | Ahilyanagar जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी (Baramati and Rahuri Assembly Constituencies) आज (सोमवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता....