Tuesday, June 16, 2026
Homeमहाराष्ट्रLalbaugcha Raja Visarjan : लालबागच्या राजाचे विसर्जन कधी होणार? मंडळाचा मोठा निर्णय

Lalbaugcha Raja Visarjan : लालबागच्या राजाचे विसर्जन कधी होणार? मंडळाचा मोठा निर्णय

मुंबई । Mumbai

मुंबईतील लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात यंदा अनपेक्षित अडचणी आल्या आहेत. गिरगाव चौपाटीवर सकाळी आठच्या सुमारास लालबागचा राजा दाखल झाला. मात्र, मूर्तीला नव्या ऑटोमेटेड तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न तब्बल तीन तास सुरू असूनही यश आलेले नाही. त्यामुळे अखेर मंडळाने ओहोटी लागल्यानंतरच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी मूर्तीला तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंतु तांत्रिक अडचणींमुळे हे प्रयत्न निष्फळ ठरले. विशेष म्हणजे यंदा विसर्जनासाठी गुजरातमधून आणलेला नवीन हायटेक तराफा तीनपट मोठा आहे. तरीसुद्धा मूर्ती सुरक्षितपणे चढवणे शक्य झालेले नाही. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे.

यावेळी समुद्रातील भरतीमुळे अडचण आणखी वाढली. सकाळी ९ वाजून १९ मिनिटांनी भरती सुरू झाली आणि ११.४० वाजता तब्बल ४.४२ मीटरपर्यंत समुद्राचे पाणी वाढले. या भरतीच्या लाटा आता राजाच्या कमरेच्या पुढे पोहोचल्या आहेत. विसर्जनाआधी मूर्तीची आरती केली जाते, मात्र मूर्ती तराफ्यावर न चढवल्याने अद्याप आरतीही पार पडलेली नाही.

ओहोटी लागेपर्यंत लालबागच्या राजाचे विसर्जन थांबवण्याचा निर्णय घेतल्याने चौपाटीवर उपस्थित असलेल्या लाखो भाविकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस आणि स्वयंसेवकांनी विशेष व्यवस्था केली असून गर्दी असूनही शिस्तबद्ध वातावरण दिसून येत आहे. दरम्यान, लालबागच्या राजानंतर आलेल्या इतर मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये चिंचपोकळीच्या चिंतामणीसह इतर मंडळांच्या मूर्तींचा समावेश आहे.

शनिवारी (६ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी १२ वाजता लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक मंडपातून निघाली होती. तब्बल २० तासांचा प्रवास करून सकाळी मिरवणूक चौपाटीवर दाखल झाली. या दीर्घ प्रवासादरम्यान हजारो भाविकांनी अंतिम दर्शन घेतले. चौपाटीवर लाखो भाविकांचा जनसागर उसळला असला तरी वातावरण भक्तिमय आणि अनुशासित होते.

यावेळी उद्योगपती अनंत अंबानीसुद्धा विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. परंतु विसर्जनास लागलेला विलंब पाहून ते स्पीडबोटीने परतल्याची माहिती मिळते. लालबागचा राजा हे नेहमीच मुंबईकरांसाठी आणि देशभरातील भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्रबिंदू राहिले आहे. यंदाच्या विसर्जनावेळी निर्माण झालेल्या अडचणींमुळे भाविकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता सर्वांच्या नजरा ओहोटी लागल्यानंतर होणाऱ्या विसर्जनाकडे लागल्या आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : जिल्ह्यात नऊ ठिकाणी केंद्रे; ६१९...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) एका जागेसाठी गुरुवारी (दि. १८) मतदान (Voting) होणार आहे. या...