फिर्याद देणारे पोलीस कॉन्स्टेबल पितळे यांची मात्र बदली
श्रीगोंदा (प्रतिनिधी)– जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्यावर अरेरावी, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल करणारे पोलीस कॉन्स्टेबल संदीप पितळे यांची बदली करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे भोस यांनी सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांची बैठक राष्ट्रवादी नेते घनश्याम शेलार याच्या निवास्थानी झाली. यात भोस यांनी समोपचाराने भूमिका घेण्याचे ठरले. भोस यांनी आणासाहेब शेलार यांच्या फोनवरून पोलीस कॉन्स्टेबल संदीप पितळे यांच्याशी बोलताना पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यावरून भोस यांच्या विरोधात पितळे यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र राविवारी उपविभागीय पोलिस अधिकारी संजयकुमार सातव यांनी भोस यांची भेट घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक जाधव यांना बोलावण्यात आले. राष्ट्रवादी नेते घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, मनोहर पोटे, दीपक भोसले आदींच्या उपस्थितीत ही बैठक सकाळी दहा वाजता झाली. यानंतर भोस यांनी आपण चाळीस वर्षे सामाजिक कामात आहोत मात्र अशी वेळ आली नव्हती, असे सांगितले. चर्चेअंती ज्या पोलीस कॉन्स्टेबलने तक्रार दिली त्याची बदली करण्याचे ठरल्याचे भोस यांनी सांगितले.
भोस आणि पोलीस निरीक्षक यांची चर्चा झाली. दोन्ही बाजुने गैरसमज दूर करण्यासाठी आपण मध्यस्थी केली. दोन्ही बाजुने दिलगिरी व्यक्त करण्यात आली. पुढारी आणि पोलीस यांचे कायम चांगले काम असते. सामाजिक कामात देखील ते पुढे असतात. आता प्रकरण मिटले आहे. मात्र पोलीस कॉन्स्टेबल संदीप पितळे यांच्याबाबत तक्रारी असल्याने त्यांची सध्या उपविभागात बदली करणात आली, असे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अन ती पत्रकार परिषद राहिली अर्धवट
पोलीस आणि महसूलच्या कारभाराबाबत पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचे बाबासाहेब भोस यांनी जाहीर केले होते. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी यांची मध्यस्थी सफल झाली आणि भोस यांची ‘ती’ पत्रकार परिषद ही अर्धवट राहिली.




