नाशिक । शाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने क्रांती घडवत बहुजनांचा आवाज बुलंद केला. दलित, आदिवासी व भटके यांच्या समस्यांना वाचा फोडत त्यांना न्याय मिळवून दिला. अण्णाभाऊंचे विचार हे देशातच नव्हे तर जगभर पोहचविण्याची गरज सोपान खुडे यांनी व्यक्त केली.
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त लोकलढा सांस्कृतिक चळवळ नाशिकतर्फे रविवारी (दि.29) आयोजीत पाचव्या दलित, आदिवासी, भटके, ओबीसी संयुक्त साहित्य संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष विचारवंत व लेखक प्रा.राम बाहेती, माजी सनदी अधिकारी बी.जी.वाघ हे उपस्थित होते.
गंजमाळ येथील रोटरीच्या सभागृहात ‘अण्णाभाऊंच्या साहित्यातील श्रमीक शोषितांचा मुक्तीचा विचार साध्य करण्याची दिशा’ या विषयावर त्यांनी विचार मांडले. ते म्हणाले, विकासाचो गोंडस स्वप्न दाखवून गोरगरिबांचा आवाज दाबला जात आहे. भटके व विमुक्तांचे प्रश्नाना न्याय मिळणे गरजेचे आहे. शिक्षणाचा मूळ प्रवाहापासून त्यांना दूर ठेवले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कल्पना पांडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर महाराष्ट्र शासनाने अन्याय केल्याचे खंत मांडली.
महाराष्ट्रातच अण्णाभाऊंचे क्रांतीकारी साहित्य वंचित राहिले. आज देखील गोरगरिबांना त्यांचे साहित्य प्रेरणा देते, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर कलाकारांनी जलसा सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. त्यानंतर लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान कला पथकाने आदिवासी प्रश्न, भटके व विमुक्तांच्या समस्या, अंतरजातीय विवाह या विषयावर प्रबोधनपर पथनाट्य सादर केले.