मनमाड : गेल्या चार दिवसा पासून बंद असलेली जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आज( बुधवार) पासून सुरु होताच भाजीपाला, किराणा यासह इतर वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजार पेठेत मोठी गर्दी झाली होती. यावेळी नागरिकांनी तोंडाला मास्क लावून सोशल डिस्टन्स पाळत वस्तू खरेदी केल्या.
आज पासून सोमवार ते शनिवार रोज सकाळी १० ते दुपारी ४ वाजे पर्यंत भाजीपाला मार्केट, किराणा दुकान, दुध डेयरी, गिरणी यासह इतर आवश्यक वस्तूंची दुकानी खुली राहणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेणकर यांनी दिली. दारू, कापड, शूज यासह इतर सर्व दुकानी मात्र बंद राहतील असे ही त्यांनी सांगितले.
दरम्यान किराणा,भाजीपाला याची दिलेली वेळ ही गैरसोयीची असल्याने त्याच्या दुपारच्या वेळेत कपात करून टी सकाळी वाढवून देण्याची मागणी नागरिक व व्यापाऱ्यांनी केली तर दुध विक्रीची वेळ देखील अत्यंत कमी असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी देखील केली जात आहे.
शहरातील आनंदवाडी भागातील एका महिलेला करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर शहरात ५ मे पर्यंत शंभर टक्के लॉक डाऊन करण्यात आला होता. त्याला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता. मात्र सलग 4 दिवस सर्वच दुकानी बंद होती. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
आज पासून पासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु होताच भाजीपाला, किराणा, दुध यासह इतर वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजार पेठेत मोठी गर्दी उसळी होती.
आनंदवाडी भाग हा अतिसंवेदनशील असल्याने डॉ.आंबेडकर रेल्वे ग्राउंडवर भरणारा बाजार आता तेथे भरणार नाही. किराणा व भाजीपाला मार्केटच्या वेळेत बदल करून सकाळी ६ वाजेपासून दुपारी २ वाजे पर्यंत तर दुध पुरवठा-डेयरी रोज सकाळी ६ वाजे ते ९ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजे पर्यंत वेळ देण्याची मागणी नागरिक व व्यापाऱ्यांनी केली आहे