नाशिक : शहरात मागील महिन्यात मुंबई, मालेगांव व शेजारील जिल्ह्यातून दाखल झालेल्या व्यक्तींकडुन करोना प्रादुर्भाव होत असल्याचे समोर आले होते. आता बाधीत व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या पाऊणे दोनशेच्यावर नागरिकांना करोना झाल्याचे समोर आले असुन यातून शहरात तयार झालेल्या ८ हॉटस्पॉटमधुन आता मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे.
याच हॉटस्पॉटमधुन आत्तापर्यत शंभराच्या जवळपास नागरिकांना करोना झाला आहे. याच भागात जवळपासुन १९९ अति जाखमीच्या व्यक्ती असुन त्यांच्यातून दररोज नवीन रुग्ण पुढे येत आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात ६ एप्रिल रोजी पहिला करोना रुग्ण आढळून आल्यानंतर एप्रिल महिना अखेर करोना रुग्णांची संख्या केवळ १० इतकीच होती. नंतर १ ते ३१ मे या कालावधीत रग्णांचा आकडा १० वरुन १९३ पोहचला गेला होता. आता तर १ ते ६ जुन अशा सहा दिवसात १७३ रुग्ण शहरात वाढले असुन रुग्ण वाढीचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
आज शहरात वडाळांगांव परिसर व वडाळानाका परिसर हा मेजर हॉटस्पॉट बनला असुन याठिकाणी दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. याच भागात तीन जणांचा मृत्यु देखील झाला आहे. त्यानंतर मेजर हॉटस्पॉट म्हणुन पंचवटीतील पेठरोड व दिंडोरीरोड परिसर ओळखला जात आहे.
याठिकाणी रामनगर दिंडोरीरोड (शनिमंदिराजवळ) येथील मार्केटमधील व्यापार्याचा मृत्यु झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले आणि त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेले अनेक जण करोनाच्या विळख्यात सापडले आहे. तसेच इतर बाधीतांच्या संपर्कात आलेले एकाच कुटूुबातील पाच सहा जणांना संसर्ग झाला आहे. या भागातील झोपडपट्टी भागात करोनाचा शिरकाव झाला असुन एकुणच या भागात शंभराच्या आसपास नागरिकांना करोना झाला आहे.
अशाप्रकारे वाढत्या संसर्गामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली असुन हा संसर्ग रोकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.
शहरात वडाळागाव परिसर, वडाळानाका परिसर, अमन रो हाऊस २ खोडेनगर वडाळा, अक्सा कॉलनी, रामनगर दिंडोरीरोड, फुलेनगर पेठरोड, भराडवाडी, क्रांतीनगर हा परिसर करोना हॉटस्पॉट बनले असले तरी यात आणखी भर पडली आहे. शहरात आत्तापर्यत १२० परिसर व इमारती – बंगले प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर करण्यात आले आहे. याठिकाणी बाधीत रुग्णांच्या संपर्कात आत्तापर्यत १६६५ अतिजोखमीच्या आणि २५०१ कमी जोखमीच्या व्यक्ती आढळून आल्या आहे.
आत्तापर्यत १३३ बाधीत बरे होऊन घरी गेल्यामुळे १२० प्रतिबंधीत क्षेत्रापैकी ४१ ठिकाणचे निर्बंध रद्द करण्यात आले आले आहे. परिणामी अतिजोखमीच्या आणि कमी जोखमीच्या व्यक्तींची संख्या कमी झाली असली तरी दररोज वाढणार्या रुग्णांमुळे यात भर पडत आहे. यामुळे महापालिकेच्या डॉक्टरांच्या १२७ पथकांकडुन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.




