नाशिक : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात काल शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात पहिल्याच दिवशी ११ हजार ४१७ लोकांनी या भोजनाचा लाभ घेतला.
राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.आतापर्यंत राज्यात १२२ केंद्रे सुरु करण्यात आली असून या केंद्राच्या माध्यमातून गरीब जनतेला १० रुपयात जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे.
शिवभोजन ही आमच्या शासनाची प्रमुख योजना असून तिची राज्यात काटेकोर आणि व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
या योजनेत अकोला २,अमरावती ३, बुलढाणा ३, वाशिम २,औरंगाबाद ४, बीड १, हिंगोलीत १, जालना २, लातूर १, नांदेड ४, उस्मानाबाद ३, परभणी २, पालघर ३, रायगड ४, रत्नागिरी ३, सिंधुदूर्ग २, परळ ३, अंधेरी ३, वडाळा २, ठाणे ७, कांदिवली २, भंडारा २, चंद्रपूर ३, गडचिरोली १, गोंदिया २, नागपूर ७, वर्धा २, अहमदनगर ५, धुळे ४, जळगाव ७, नंदूरबार २, नाशिक ४, कोल्हापूर ४, पुणे १०, सांगली ३, सातारा ४, सोलापूर ५ अशी केंद्रे सुरु झालेली आहेत.




