वांबोरीतील डोंबारी कुटुंबांना पोलिसांनी दिला किराणा
अहमदनगर (प्रतिनिधी)- बंदोबस्तासोबतच लॉकडाऊनच्या काळात कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घेणार्या पोलिसांच्या मायेचा हात आज वांबोरीतील डोंबारी कुटुंबाच्या पालातही पोहचला. तेथील जवळपास 80 कुटुंबांना पोलिस दलाने किराणा, धान्यासह जीवनावश्यक वस्तू दिल्या.
नगरचे डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पुढाकारातून सामाजिक संघटनांच्या दातृत्वातून नगर पोलिसांनी भुकेल्यांना अन्न व निवारा देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. तृतीयपंथीय, विधवा, भिक्षुकीसारख्या दुर्लक्षित घटकांना मदतीचा हात दिल्यानंतर पोलीस दलाने आज डोंबारी कुटुंबांनाही मायेचा हात दिला. लॉकडाऊन संपून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत पोलीस मदतीचा हा उपक्रम सुरू राहणार असल्याची माहिती डीवायएसपी संदीप मिटके यांनी दिली.
अंग कसरत करत रस्त्यावर खेळ करण्यासोबतच गावोगावच्या जत्रात खेळणी विकून व सर्कस करत पोटाची भुक भागविणारे कुटुंब उपाशी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची कुमक मदतीसह वांबोरीत पोहचली. एसपी अखिलेशकुमार सिंह, एएसपी सागर पाटील यांच्या सूचनेनुसार डोंबारी कुटुंबांना आज गहू, तांदूळ, तेल, दाल व इतर किराणा / जीवनावश्यक वस्तू साहित्याचे वाटप केले.
मदत वेळेत मिळल्यामुळे त्या डोंबारी कुटुंबियांनीही डीवायएसपी संदीप मिटके, हरजीत वधवा, प्रशांत मुनोत यांचे आाार मानले. कोरोना या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून उच्चस्तराचे उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रशासना तर्फे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. अत्यावश्यक कारण शिवाय रस्त्यावर फिरू नये, गर्दी करू नये, प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीशी वाद घालू नये, असे आवाहन डीवायएसपी संदीप मिटके यांनी केले आहे.




