भाळवणी (प्रतिनिधी) – सध्या उन्हाची दाहकता वाढत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात वस्त्यांजवळ येत आहेत. यातून बऱ्याचदा त्यांचा मानवाशी संघर्ष होतो. कधीकधी रस्ते ओलांडताना अपघात होतात. म्हणून धन्वंतरी मेडिकल ॲण्ड एज्युकेशनल फौंडेशन अहमदनगर संस्थेचे अध्यक्ष डॉ. सईद काझी यांच्या संकल्पनेतून आश्रमशाळा परिवाराने ढवळपुरी, भाळवणी व परिसरातील या मुक्या वन्यजीव प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे.
ढवळपुरी फाट्यानजीक भोंडवेवस्ती जवळील वनविभाग अंतर्गत येणाऱ्या जंगलामध्ये तसेच हिवरेकोरडा वनविभागाच्या जंगलामध्ये हरीण,काळवीट, मोर, ससे आदी अनेक प्रकारचे जंगली प्राणी व पक्षी वास्तव्यास आहेत. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधार्थ अनेक वेळा हे वन्यजीव मानवी वस्तीत वावर करताना दिसून येत आहे. रखरखत्या उन्हात पिण्यासाठी पाणी नसल्याने त्यांची भटकंती होते. अनेक वेळा त्यांना आपला प्राण गमवावा लागतो.
वनविभागाने या मुक्या प्राण्यांची तहान भागविण्यासाठी पाणवठे तयार केलेले आहेत. परंतु पाण्याचा अभाव असल्याने डॉ. सईद काझी यांनी आश्रमशाळा परिवाराकडून पाणवठ्यावर पाणी सोडण्याची व्यवस्था केली असून १ मे महाराष्ट्र दिनापासून आश्रमशाळेच्या टँकरने पाणी सोडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
यावेळी वनविभागाचे वनरक्षक श्री. निलेश बढे, वनरक्षक श्री. गजानन वाघमारे, माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. बापूसाहेब रुपनर, प्राथमिक आश्रमशाळेचे शिक्षक राजाराम वाघ, लतिफ राजे, अमोल बांगर, प्रदिप साळवे, सुरेंद्र पाटील, वैभव गावडे, पिंपळे मामा हे उपस्थित होते. पावसाळा सुरू होईपर्यंत दररोज या वन्यजीव प्राण्यांसाठी २०००० ली. पाणीपुरवठा आश्रमशाळा परिवाराकडून करण्यात येणार आहे.




