नवी दिल्ली | New Delhi
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज येथे महाकुंभमेळा (Mahakumbh Mela) सुरु असून या मेळ्यात काल (दि.२९) मध्यरात्रीच्या सुमारास चेंगराचेंगरी (Stampede) होऊन ३० जणांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली होती. तर महाकुंभाच्या जत्रा परिसरात रविवार (दि.१९ जानेवारी) रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास शास्त्री पुलाजवळ सेक्टर १९ येथील गीता प्रेसच्या कॅम्पमध्ये आग लागली होती. या आगीत गीता प्रेसच्या १८० कॉटेज जळून खाक झाल्या होत्या. त्यांनतर आता पुन्हा एकदा महाकुंभमेळ्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महाकुंभाच्या सेक्टर २२ मध्ये ही भीषण आग (Fire) लागली असून या आगीत १५ टेन्ट जळून खाक झाले आहेत. तसेच या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अनेक तंबू देखील जळाले आहेत. यावेळी पंडालमध्ये उपस्थित सर्व लोक (People) सुरक्षित असून अग्निशमन दलाने अथक परिश्रमानंतर काही मिनिटांत आग आटोक्यात आणली.या आगीच्या ज्वाळा लांबच्या अंतरावरुन दिसत होत्या असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यामुळे यावरुन आगीची तीव्रता कळू शकते.
दरम्यान, महाकुंभाचा सेक्टर २२ छतनाग घाट आणि झुशीच्या नागेश्वर घाटाच्या दरम्यान येतो. येथे असलेल्या तंबूत अचानक आग लागली, त्यामुळे लोक सावध झाले. याबाबत भाविकांनी (Devotees) अग्निशमन दलाला माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी आग विझवण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणी आग लागली तेथे कोणीही नागरिक उपस्थित नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच ही आग नेमकी कशामुळे लागली? याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.