मुंबई | Mumbai
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Election) भाजप महायुतीला (Mahayuti) घवघवीत यश मिळाले असून विधानसभेच्या २८८ जागांपैकी तब्बल २३७ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये एकदम काँटे की टक्कर पाहायला मिळणार असे वातावरण निवडणुकीआधी निर्माण झाले होते. मात्र २३ नोव्हेंबरला सर्वांनाच धक्का बसला. ज्या महाविकास आघाडीने सत्तास्थापनेची स्वप्न पाहिली त्यांना ५० चा आकडाही पार करता आला नाही.
मात्र आता निवडणुकीनंतर हा जनतेने दिलेला कौल नसून ईव्हीएममध्ये घोटाळा (EVM Scam) असल्याचे मविआचे नेते म्हणू लागले आहेत.यामध्ये ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही निवडणूक बॅलेट पेपरवर पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नाशिक जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांच्या मतांची आकडेवारी ट्विट करत काही सवाल उपस्थित केले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, अशा आशयाची पोस्ट करत १२ आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर केली आहे. तर रोहित पवार यांनी विजयी उमेदवारांची आकडेवारी मांडत गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का? असा खडा सवाल केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी? एका सामान्य नागरिकाने सदरील आकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो. निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरं-काय खोटं हे सांगायला तयार नाही. आयोग नेमकं काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे? की लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत. तरी आयोग जनभावना लक्षात घेऊन लवकरच स्पष्टीकरण देईल, ही अपेक्षा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड स्वत:एक लाखांच्या मताधिक्याने निवडून आले असले तरी त्यांनी ईव्हीएमबाबत रोष व्यक्त केला आहे.तर यंदाच्या निवडणुकीमध्ये रोहित पवार हे फक्त १२४३ मतांनी निवडून आले आहेत. मात्र,
त्यांनी देखील ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे. दुसरीकडे आज शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक बोलवली होती. या बैठकीत देखील पराभूत उमेदवारांनी (Candidates) ईव्हीएमबाबत रोष व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवारांनी (Sharad Pawar) भूमिका घ्यावी अशी देखील विनंती या उमेदवारांनी केली. त्यामुळे आता शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा