मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा (Mercury of Temperature) ४० अंश सेल्सिअसच्या पार पोहोचला आहे. याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत असून, रस्ते आणि बाजारपेठांत शुकशुकाट बघायला मिळत आहे. उन्हाच्या या तीव्रतेमुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागत आहे. नाशिक येथून परभणीत (Parbhani) भावाकडे आलेल्या ३७ वर्षीय व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी बबन कांबळे (वय ३७) असे मृत्यू (Death) झालेल्या व्यक्तीचे नाव असून, मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत शिवाजी कांबळे हे नाशिक येथील पिंगळे मळा येथे वास्तव्यास आहेत. गुरुवार (दि.२३ एप्रिल) रोजी ते त्यांचे बंधू महादेव बबन कांबळे यांच्याकडे आले होते.शुक्रवार (दि.२४ एप्रिल) रोजी सकाळी ते आपल्या कुटुंबासह त्यांच्या साडूला भेटण्यासाठी परभणीत आले होते. दिवसभर बाहेर फिरल्यावर त्यांना चक्कर आली आणि ते एका खड्ड्यात पडलेल्या अवस्थेत सापडले. यानंतर त्यांना लागलीच रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हे देखील वाचा : Nashik Temperature News : उन्हाच्या तीव्र झळांनी जिल्हा होरपळला; पारा तब्बल ‘इतक्या’ अंशावर
दरम्यान, दिवसभर उन्हात फिरल्यामुळे चक्कर आल्याने शिवाजी कांबळे यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती त्यांचे बंधू महादेव कांबळे यांनी नानल पेठ पोलीस ठाण्यात दिली. या घटनेनंतर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच बाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा गॉगल वापरणे, तसेच पाण्याची बाटली सोबत ठेवणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे
विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
अकोला – ४५.६ अंश सेल्सिअस, अमरावती – ४५.६ अंश सेल्सिअस, भंडारा – ४४.० अंश सेल्सिअस, बुलढाणा – ४२.२ अंश सेल्सिअस, चंद्रपूर -४४.२ अंश सेल्सिअस, गडचिरोली – ४३.६ अंश सेल्सिअस, गोंदिया – ४३.६ अंश सेल्सिअस, नागपूर – ४४.०२ अंश सेल्सिअस, वर्धा – ४५.५ अंश सेल्सिअस, वाशीम – ४३.० अंश सेल्सिअस आणि यवतमाळ – ४३.० अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.





