मुंबई । Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचा गंभीर दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, अनेक मंत्र्यांचे फोन वारंवार ‘नॉट रीचेबल’ दिसत आहेत. यामागील कारण म्हणजे मंत्र्यांचे संभाषण टॅप होत असल्याची भीती आहे. यामुळे काही मंत्री स्वतःहून फोन बंद ठेवत असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. “हा विषय सध्या दबक्या आवाजात चर्चिला जात आहे. पण येत्या काळात या दाव्यांमध्ये किती सत्यता आहे, हे स्पष्ट होईल,” असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
या आरोपांमुळे राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, विरोधकांनी यावरून सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची तयारी सुरू केली आहे. मंत्र्यांचे फोन खरंच टॅप होत आहेत का, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र, या दाव्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणावर अधिक प्रकाश पडेल, अशी अपेक्षा आहे.





