मुंबई । Mumbai
तप्त उन्हाच्या झळांनी होरपळणाऱ्या महाराष्ट्राला अखेर निसर्गाने काहीसा दिलासा दिला आहे. केरळमध्ये वेळेत हजेरी लावल्यानंतर बळीराजाचा लाडका मान्सून आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. दक्षिण कोकणाच्या वेशीवरून मान्सूनने महाराष्ट्रात अधिकृत प्रवेश केला असून, यामुळे राज्यातील पावसासाठीचे वातावरण सध्या कमालीचे अनुकूल बनले आहे.
राज्यातील अनेक भागांत ढगाळ हवामानासह पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत असल्याने हवेत गारवा पसरला आहे. या बदलत्या वातावरणामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांची लगबग सुरू केली आहे; मात्र याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला दिला आहे.
काय म्हटलंय मुख्यमंत्रांनी?
किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी
मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.
सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.
दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे :-
✅आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये.
✅विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे.




