मुंबई | Mumbai
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वात बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि इतर वाहनांतून नागपूरमध्ये (Nagpur) महाएल्गार मोर्चा काढण्यात आला आहे. बच्चू कडू यांनी आठ मागण्या राज्य सरकारकडे केलेल्या आहेत. कालपासून हे आंदोलन सुरु असून, आज दुसरा दिवस आहे. या आंदोलनामुळे नागपूरमधील वाहतुक व्यवस्था कोलमडली असून, लोकांची गैरसोय होत आहे. या आंदोलनामुळे होणार्या प्रवाशांच्या गैरसोईची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने सुमोटो दखल घेत कडू यांनी आज सायंकाळी ६ पर्यंत सहकाऱ्यांसह आंदोलन स्थळावरून बाजूला व्हावे असे निर्देश दिले होते. मात्र कडू यांनी आंदोलन स्थळावरून बाजूला होण्यास नकार दिला.
नागपूर खंडपीठाच्या (Nagpur Bench) आदेशात म्हटले की, “आंदोलनासाठी बच्चू कडू यांना २८ ऑक्टोबरसाठी परसोडी गावाजवळच्या मैदानावर परवानगी देण्यात आली होती. मात्र,आज दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरु असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना त्रास होत आहे, असे म्हटले.तसेच या आदेशात ०१ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनासंदर्भात जी याचिका स्वीकारली होती त्याचा उल्लेखही करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांनी संध्याकाळपर्यंत ठिय्या आंदोलन (Protest) सुरू असलेली जागा मोकळी करण्याची प्रक्रिया सुरू करावी असे आदेशात म्हटले होते.
तसेच नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी आदेशाची पूर्तता केल्यासंदर्भातील रिपोर्ट उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करावा असेही न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय संबंधित क्षेत्राचे पोलीस अधिकारी तसेच महामार्ग पोलिसांनी आदेशाची पूर्तता करावी असेही न्यायालयाने त्यांच्या निर्देशात म्हटले आहे. दुसरीकडे न्यायालयाने आदेश देऊनही बच्चू कडू मागे हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कोर्टाच्या आदेशानंतर कडू काय म्हणाले?
यावेळी बच्चू कडू म्हणाले, “आम्ही कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणार नाही. मात्र, जर आंदोलन करायला आलेले सोबतचे लोक आंदोलन सुरू ठेवायचे आहे असे म्हणत असतील तर आम्ही आंदोलन सुरू ठेवू. आता लोक न्यायालय आणि विधी न्यायालय यांच्यातील हा संघर्ष आहे. आम्ही न्यायालयाचा अवमान करणार नाही. मात्र, लोक न्यायालयाचे ऐकणे सोडणार नाही,” असे त्यांनी म्हटले,




