नाशिक | Nashik
नागपूरमध्ये (Nagpur) डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ‘भारतदुर्गा’ मंदिराचा शिलान्यास सोहळा काल (शुक्रवारी) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यानंतर आयोजित ‘धर्मसभे’मध्ये बोलतांना बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संदर्भातील एक विधान केले. या विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
दुसरीकडे सुमारे साडेतीन दशकापूर्वी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून राज्यात वादंग निर्माण झाला आहे. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना गलिच्छ शिवीगाळ आणि ठार मारण्याची धमकी देणारी शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांची ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर आज (शनिवारी) नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही घटनांवर प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले की, “इतिहासात असा कुठलाच प्रकारचा दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही. मूळात आपल्याला माहिती आहे की, जे महापुरुष असतात, त्या महापुरुषांबाबत अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात. रामायण आणि महाभारताच्या संदर्भातही लोककथा आहेत. त्या सगळ्याचा इतिहासावर किंवा तेथील परिस्थितीवर अवलंबून त्या तयार होत असतात किंवा झालेल्या आहेत. मी यावर एवढेच म्हणेन की, आपण जो इतिहास शिकलो आहोत किंवा आपल्याकडे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत, त्यात अशा प्रकारचा कोणताही दाखला नाही”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
तसेच ” संजय गायकवाड प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,”एकतर गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्या समजून न घेता आपण आकांडतांडव करतो, तेव्हा ते योग्य होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. आता हे पुस्तक छापून ४० वर्षे झाली आहेत. आता ४० वर्षांनंतर अशा पद्धतीने एखादा मुद्दा तयार करणे, हे कितपत योग्य आहे, याचा विचार केला पाहिजे. विशेषतः अशा पद्धतीने शिवराळ भाषा वापरणे, हे मला योग्य वाटत नाही” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.




