सातपूर | प्रतिनिधी | Satpur
शिवसेना युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी आज (गुरुवारी) अंबड लिंक रोडवरील पपई नर्सरी ते गरवारे परिसरातील रस्त्याची पाहणी करून दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्त्याचे काम, बांधकामातील त्रुटी आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर त्यांनी सवाल उपस्थित केले.
अंबड लिंक रोडवरील (Ambad Link Road) रस्त्याची उंची मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली असून, त्यामुळे आजूबाजूच्या व्यावसायिकांना पावसाळ्यात पाण्याचा (Water) त्रास होण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासनाने कोणती दक्षता घेतली आहे, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. पावसाळ्यात काम करायचे नव्हते, तर एवढ्या आधी रस्ता खोदला कशासाठी, असा सवालही त्यांनी केला.
रस्त्याच्या बांधकामात नियोजनाचा अभाव दिसून येत असून, नागरिक (Citizen) व व्यावसायिकांना होत असलेल्या त्रासाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. रस्त्याची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी परिसरातील शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांना विविध समस्यांची माहिती दिली. वेळोवेळी आंदोलने आणि निवेदने देऊनही समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, खुद्द नगरसेवकांना रस्त्यावर बसून आंदोलन करण्याची वेळ येत असल्याचे शिवसैनिकांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाच्या कारभारावर सत्ताधाऱ्यांचा किती अंकुश आहे, असा सवाल उपस्थित केला.
दरम्यान, यावेळी शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाध्यक्ष डी. जी. सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशोक भाऊ पारखे, उपमहानगर प्रमुख विनोद घरटे, वैभव ढिकले, किशोर निकम, अंकित पारखे, बापू पारखे, संकेत पारखे, राजू राठोड, बाविस्कर काका, देवरे काका, मयूर ठोंबरे, सुजीत पवार, आकाश भावले, श्रेयश इनामदार, संकेत शिंदे, सार्थक देशमाने, गणेश केने, सुनील चव्हाण, अरुण येवले यांच्यासह सातपूर व जाधव संकुल परिसरातील शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.




