नाशिक | Nashik
देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क व अधिकार देणाऱ्या संविधानाला अभिप्रेत देश निर्माण करण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे. पण या विचारधारेला छेद देऊन लोकांना लाचार बनवणारी शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा विचार भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे. संविधान विरूद्ध मनुवादाच्या या लढाईत माजी सरसंघचालक गोलवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट’ वर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा भाजपा व संघाचा डाव हाणून पाडा व संविधानाचा विचार अंगिकारावा तोच देशाला तारणारा आहे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या निवासी कार्यशाळेचा सांगता कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, राजसत्ता व धर्मसत्ता ही मुठभर विशेष लोकांच्या हाती असावी हा संघाचा विचार आहे. सत्ता, संपत्ती, द्वेष, भय, यातून धर्मांध राजकारण करत आहे. अधिकार नाकारणारा, हम करे सो कायदा हा भाजपा विचार आहे. मागील काही वर्षात हा मनुवाद वाढत आहे. अब की ४०० पार कशासाठी तर संविधान बदलण्यासाठी भाजपाला हवा आहे. याच विचाराने छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारला. काँग्रेसची विचारधारा संविधानाची विचारधारा आहे. समता, बंधुता, शांती, सर्वांना समान न्याय हक्क, स्त्री पुरुष समानता असा आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर, वारकरी संप्रदायाचा विचार आहे, महापुरूषांचा विचाराला एक प्रवाह आहे आणि तो काँग्रेसचा विचार आहे. भाजपाची आयडिया ऑफ इंडिया व काँग्रेस ची आयडिया ऑफ इंडिया यात मोठा फरक आहे. आपल्याला काँग्रेस च्या आयडिया ऑफ इंडियाचा विचार पुढे घेऊन जायचे आहे. काँग्रेसच्या (Congress) विचारानेच शिक्षण हक्क कायदा, मनरेगा, माहितीचा अधिकार कायदा, अन्न सुरक्षा कायदा दिला. काँग्रेस चा आत्मा व देशाचा आत्मा एकच आहे. असे सपकाळ यांनी म्हटले.
दरम्यान, यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, प्रदेश सरचिटणीस ब्रिज किशोर दत्त, अॅड. संदीप पाटील, प्रकाश सोनावणे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड, नाशिक उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश कहांडाळ, नाशिक दक्षिण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भारत टाकेकर, प्रवक्ते हनुमंत पवार, प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के यांच्यासह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी कुलकर्णी, शाह आलम शेख, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनीही या शिबिराला मार्गदर्शन केले.
माजी मंत्री वसंत पुरके काय म्हणाले?
समारोपाच्या भाषणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री वसंत पुरके यांनी आपल्या भाषणातून भाजपा सरकारच्या धर्मांध राजकारणावर सडकून टीका केली. ते म्हणाले,भाजपाची फोडा आणि राज्य करा निती असून समाजात जाती धर्मांमध्ये भांडणे लावून भाजपा राजकीय पोळी भाजत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानामुळे आणि काँग्रेस सरकारांनी राबवलेल्या धोरणांमुळे या देशातील गरीब, ओबीसी, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी समाजाला शिक्षण व अधिकार मिळाले. त्यामुळे ते मुख्य प्रवाहात आले. भाजप सरकार हळूहळू या सर्वांचे हक्क काढून घेत आहे. त्यांच्या कल्याणकारी योजनांवरील निधीची कपात करत आहे. विकासाची स्वप्ने दाखवून भाजप समाजात विभागणी करत आहे. भाजपाच्या दडपाशाहीला व भूलथापांना बळी पडू नका, काँग्रेसचा विचारच देशाला तारू शकतो असे त्यांनी म्हटले.




