मुंबई | Mumbai
संपूर्ण महाराष्ट्रासह देशाला हादरवून टाकणाऱ्या पुणे जिल्ह्यातील (Pune District) नसरापूर (Nasrapur) येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुणे विशेष न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. या अत्यंत घृणास्पद कृत्यातील ६५ वर्षीय नराधम आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला दोषी ठरवत न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या ऐतिहासिक निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, “मी न्यायालयाच्या (Court) या निर्णयाचे स्वागत करतो. अशा अमानुष आणि अमानवीय कृत्यांना जरब बसवण्यासाठी फाशीचीच शिक्षा गरजेची होती. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहविभागाच्या माध्यमातून या केसवर स्वतः बारीक लक्ष ठेवले होते. मी स्वतः पोलीस महासंचालक (DG) आणि पोलीस अधीक्षक (SP) यांच्याशी सातत्याने संपर्कात होतो. पोलिसांनी रात्रीचा दिवस करून अवघ्या दोन आठवड्यांत चार्जशीट सादर केली. या गतिमान तपासामुळेच नराधमांच्या मनात भीती निर्माण होईल आणि अशा प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढणार नाहीत”, असे शिंदे यांनी म्हटले.
केतन अग्रवाल प्रकरणही जलद न्यायालयात चालवू
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, ” पुण्यातील केतन अग्रवालचे (Ketan Agrawal Case) जे प्रकरण आहे त्यामध्ये इंटेनशन ठेवून (नियोजित कट करुन) हत्या असेल किंवा रेप असेल तर अशा गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी असे प्रकरणही जलद न्यायालयात (फास्ट ट्रॅक) नेऊ आणि त्याचा निकाल लावू”, असे त्यांनी म्हटले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
१ मे रोजी पुणे जिल्ह्यातील नसरापुरात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली होती. नराधम भीमराव कांबळे याने साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीला फूस लावली होती. यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आणि तिचा मृतदेह एका गोठ्यात लपवून ठेवला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती आणि आरोपीला कठोर शिक्षेच्या मागणीसाठी राज्यभरात निदर्शने झाली होती.




