मुंबई | Mumbai
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) मिळावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे आमरण उपोषण सुरु आहे. आज (रविवारी) त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी भेट घेऊन परतत असताना मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.
सुप्रिया सुळे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेऊन परतल्या असता त्यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला. यानंतर गाडीमध्ये बसल्यावर आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर बॉटल फेकली. यावेळी काही मराठा आंदोलकांनी गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.मात्र, बरेच मराठा आंदोलक (Maratha Protester) हे गाडी अडवण्यासाठी पळत जाताना दिसून आले. तसेच शरद पवारांनी मराठ्यांचे वाटोळे केले, असेही आंदोलक म्हणाले. याशिवाय शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जरांगे यांची भेट घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की,”तुमच्याकडे २५० आमदार आहेत, खरंच काम करायचं असेल तर सरकार ते काम का करू शकत नाही. माझी हात जोडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती आहे. सगळ्या पक्षांना बोलवा. तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवा. त्यानंतर लगेच एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्गी लावा. सगळेचं लोकं येथे भेटायला येत आहे. कुणाचाच विरोध नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय पास करुन टाकावा”, असे त्यांनी म्हटले.





