मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) नरिमन पॉईंट येथील ४.२ एकर जागेची विक्री रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला केल्याने फ्री प्रेस जर्नल मार्गावरील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटासह आठ राजकीय पक्षांच्या (Political Party) कार्यालयांवर कायमचे विस्थापित होण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जागा विक्रीचा व्यवहार रद्द करून नरिमन पॉईंट येथील पूर्वीच्याच जागी पक्षाला कार्यालय बांधून देण्याची मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते सचिन सावंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना एमएमआरसीएल आणि राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली. राजकीय पक्षांना अंधारात ठेवून परस्पर जागा विक्रीचा निर्णय घेऊन एमएमआरसीएल आणि राज्य सरकारने काँग्रेस पक्षासहित इतर राजकीय पक्षांबरोबर रिझर्व्ह बँकेचीही फसवणूक (Fraud) केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
काँग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांच्या नरिमन पॉईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच जागी काँग्रेस पक्षासह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन एमएमआरसीएलने दिले होते. आता मात्र त्यांनी दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे. काँग्रेस पक्षाशी कोणतीही चर्चा न करता ही जागा परस्पर रिझर्व्ह बँकेला विकण्यात आली. ५ सप्टेंबर रोजी या व्यवहाराची नोंदणी करण्यात आली, अशी माहिती सावंत यांनी दिली.
मुंबई मेट्रो (Mumbai Metro) टप्पा-३ चे काम पूर्ण झाल्यानंतर फ्री प्रेस जर्नल मार्गावरील त्याच जागेत नव्याने कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करून राजकीय पक्षांना कार्यालये देण्याची आवश्यक ती कार्यवाही करावी, असा शासन आदेश २१ ऑक्टोबर २०१५ रोजी काढण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मेट्रोच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरुपात कार्यालय हस्तांतरीत करावे, असे पत्र २ डिसेंबर २०१६ रोजी काँग्रेस पक्षाला दिले होते, याकडे सावंत यांनी लक्ष वेधले.
सामान्य माणसाच्या जमीन अधिग्रहणातही अशीच फसवणूक होत असेल म्हणून जनतेचा अशा प्रकरणाच्या जमीन अधिग्रहणावर विश्वास राहिलेला नाही. नरिमन पाईंट येथील या जागेचे बाजारमूल्य ५ हजार २०० कोटी रुपये आहे. पण ३ हजार ४०० कोटी रुपयांचा व्यवहार करून १ हजार ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा व्यवहार अहंकारी, मनमानी तसेच गुन्हेगारी स्वरुपाचा असून तो तात्काळ रद्द करावा, अशी मागणी सचिन सावंत यांनी यावेळी केली.
राजकीय पक्षांना फटका
नरिमन पॉईंट येथील भूखंड विक्रीचा फटका काँग्रेस (गांधी भवन), राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी भवन), शिवसेना ठाकरे गट (शिवालय) या प्रमुख पक्षांसह प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी, माजी आमदार टी. एम. कांबळे यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) या राजकीय पक्षांना बसला आहे. मेट्रोचे काम सुरू होण्यापूर्वी या जागेवर राजकीय पक्षांची कार्यालये तसेच विविध शासकीय विभागाची आणि महामंडळाची कार्यालये (Office) होती.




