मुंबई | Mumbai
बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे विरोधकांकडून मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील काही आमदारांसह आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.
भाजपचे आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतांना दिसत असून ते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंना लक्ष्य करत आहेत. दुसरीकडे धस यांच्याकडून मंत्री धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून आमदार व प्रवक्ते अमोल मिटकरी आणि युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण सरसावल्याचे पाहायला मिळत आहे. मिटकरी यांनी धस यांच्यावर खंडणी, हत्या व जमिनी बळकावल्याचे गुन्हे असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर,आमदार धस यांनी त्यांच्या स्टाईलने प्रत्युत्तर देत टीका केली आहे.
आमदार सुरेश धस म्हणाले की,”अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे पहिली दुसरीच्या वर्गात आहेत, चड्डीत असल्यापासुन ते आतापर्यंत त्यांनी जे आरोप केले आहेत त्या सर्वात क्लिनचीट मिळाली आहे. संतोष देशमुख खुनापासुन लक्ष विचलित करण्याचा मिटकरींचा प्रयत्न असून माझाही सीडीआर काढा. मी कोणत्या कामासाठी वाल्मिक कराडला फोन केला होता तेही त्यांनी जाहीर करावे. राष्ट्रवादीतील बडी मुन्नी अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण यांच्यासारख्या बारक्या-सारक्या लेकरांना बोलायला लावत आहे. बडी मुन्नीने पुढं यावं,मी मुन्नीची सुन्नी करतो”,अशा शब्दात सुरेश धस अमोल मिटकरींच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे.
तसेच राष्ट्रवादी (NCP) खून्यांना पाठीशी घालते का?,मी अजित पवार (Ajit Pawar) यांचीही भेट घेतली होती, त्यावेळी यांना जवळ ठेवू नका अशी मागणी केली होती. अमोल मिटकरी यांचा तेरेनाम झाला आहे, कोण ओबीसी नेता, कोण हाके?, असे म्हणत धस यांनी मिटकरी व हाकेला महत्त्व देत नसल्याचे सांगितले. संतोष देशमुख यांच्या दोषीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यात कोणी असेल त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. राष्ट्रवादीचे लोक खुन्यांना पाठीशी घालत असून त्यांनी मेलेल्या माणसांच्या बाजूने उभे राहावे, असेही आमदार सुरेश धस यांनी म्हटले.
आमदार मिटकरी नेमकं काय म्हणाले होते?
‘मृत सरपंच देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा हीच आमची भूमिका आहे. काल त्यांच्या परिवाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या प्रकरणात दोषी, मग ते कोणीही असतील, कराड असोत किंवा आणखी कोणी, त्यांना फाशी द्या, हीच आमची भूमिका आहे. पण या प्रकरणाच्या माध्यमातून अनेकांना धनंजय मुंडेंचा काटा काढायचा आहे. ‘धस यांनी जेव्हा पहिल्यांदा आरोप केला होता, तेव्हा मी एक ट्विट केले होते, हमाम में सब नंगे है. जेव्हा एक बोट तुम्ही दुसऱ्याकडे दाखवता, तेव्हा चार बोटं तुमच्याकडे असतात. धसांनी विधिमंडळात तो मुद्दा उपस्थित केला, त्याचं आम्ही स्वागतच केलं. त्याला सगळ्या पक्षांनी गांभीर्याने घेतले,त्याची तीव्रता आम्हाला त्यातून समजली. पण आता ते बेछूट, एकेरी बोलत आहेत. फडणवीस, बावनकुळेंनी सांगूनही ते ऐकत नसतील, तर मग त्यांच्याबद्दल बोलण्यासारखंही खूप आहे, असा सूचक इशारा मिटकरींनी दिला होता.
तसेच सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या २ दिवस आधी कराड, धस संपर्कात होते. तर मग खून, खंडणी प्रकरणात धस यांचीशी चौकशी झाली पाहिजे. ही केवळ आमची मागणी नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचीही तीच मागणी आहे. त्यामुळेच मी म्हटलेलं हमाम मे सब नंगे है. बोलण्यासारखं आमच्याकडेही भरपूर आहे. योग्य वेळी आम्ही योग्य पुरावे देऊ. देशमुख यांची हत्या होण्याच्या २ दिवस आधी कराड आणि धस यांचे संभाषण झालेलं आहे. त्या कॉलची कथित क्लिप पोलिसांकडे गेल्याचे आम्हाला समजले आहे. त्यामुळे कराड यांचा सीडीआर काढाच, पण त्यासोबतच धस यांचाही सीडीआर काढा”, अशी मागणी मिटकरींनी केली होती, त्यावर आमदार सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.