मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार (Mahayuti Government) हे शेतकरी विरोधी असल्याचे वारंवार उघड झाले आहे. शेतकऱ्याला (Farmer) अतिरेकी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणून त्याचा अपमान केला. आता राज्यातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अकलेचे तारे तोडले आहेत. कोकाटे यांचे शेतकऱ्यांबद्दलचे विधान सत्तेचा माज आल्याचे दर्शवते. शेतकरी भिकारी नाही तर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला जीएसटीच्या माध्यमातून लुटणारे भाजप महायुतीचे सरकारच भिकारी आहे, अशी जळजळीत टीका प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केली.
माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) यांनी शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेताना पटोले यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याचा अपमान करणे ही विकृती आहे. भाजप युती सरकार हे शेतकरी विरोध असून फक्त धनदांडग्यांसाठी काम करत आहे. सरकार एक रुपयात पीक विमा देते म्हणजे शेतकऱ्यांवर उपकार करत नाही आणि हे पैसे माणिकराव कोकाटे त्यांच्या खिशातून देत नाहीत. सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देत नाही, कर्जमाफी देत नाही. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना भरमसाठ आश्वासने देऊन भाजप युतीने मतांची भीक मागितली. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या कृषी साहित्यावर १८ टक्के जीएसटी लावून सरकार शेतकऱ्यांकडूनच भीक घेते आणि वरून शेतकऱ्यांनाच भिकारी म्हणते, असे पटोले म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या नावावर विविध योजनांमध्ये कृषी मंत्रालय (Ministry of Agriculture) कशी मलई खाते याचा पर्दापाश नुकताच आम्ही केला आहे. पीक विमा योजनेतही भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्र्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.