
परभणी | Prbhani
खासदार संजय (बंडू) जाधव (Sanjay Jadhav) यांच्या वतीने परभणीत आयोजित ‘शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’च्या जोरदार घोषणा दिल्याने काही काळ गोंधळ उडाला. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या इशाऱ्यामुळे या कार्यक्रमाबाबत तणावाचे वातावरण होते. मात्र, घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना आपलेच लोक सांगत शिंदेंनी शांत राहण्याचे आवाहन केले आणि कोणाचेही आरक्षण (Reservation) कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणारच, अशी ठाम ग्वाही दिली.
मराठा आरक्षणावर भूमिका
यावेळी शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे यांची समाजाविषयीची तळमळ मला ठाऊक आहे. आमचे मंत्री (Minister) त्यांच्याशी सातत्याने चर्चेत आहेत. ठरलेला कार्यक्रम ऐनवेळी रद्द करणे शक्य नव्हते, पण मराठा समाजाला न्याय देण्याचे काम महायुती सरकारच करेल.मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (DCM) झालो तरी ‘लाडक्या बहिणींचा भाऊ’ हीच माझी सर्वात मोठी पदवी आणि ओळख आहे. राज्य सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकरी, युवक आणि लाडक्या बहिणींचा आहे”, असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा : Manoj Jarange Patil : “बंडू जाधव तू आयुष्यातील…”; मनोज जरांगेंचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
बंडू जाधवांचे पक्षात स्वागत
पुढे ते म्हणाले की, “विरोधात राहून विकास शक्य नाही हे ओळखून खासदार बंडू जाधव खऱ्या शिवसेनेत आले आहेत. परभणीच्या विकासासाठी ११० कोटींचा निधी दिला असून, डबल इंजिन सरकार परभणीचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. दरम्यान मनोज जरांगे यांनी या मेळाव्याला विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव यांनी ऐनवेळी कार्यक्रम रद्द केला असता तर मोठा अनर्थ घडला असता. तरीही मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हटले.
सभागृहातील गोंधळ आणि पोलिसांना सूचना
दरम्यान एकनाथ शिंदेंचे भाषण सुरू होताच आंदोलकांनी घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी काहींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, “हे आपलेच लोक आहेत, त्यांना बाजूला आदराने उभे राहू द्या,” अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.




