मुंबई | Mumbai
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीला घवघवीत यश मिळाले. यात महायुतीला २३७ आणि महाविकास आघाडीला ४९ जागांवर विजय मिळविला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्याने विरोधकांकडून ईव्हीएमवर (EVM) शंका उपस्थित केली जात आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी या गावातील नागरिकांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची तयारी सुरू केली होती. या मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर आग्रही होते.
मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे हे मतदान टळले. त्यानंतर आमदार उत्तम जानकर (MLA Uttam Jankar) यांनी निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार असेल तर आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे म्हटले होते. यानंतर आता पुन्हा एकदा आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली असून महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत १५० मतदारसंघात गडबड असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी अजित पवार यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महायुतीमधील तीनही पक्षांना किती जागा मिळाल्या याचे गणित मांडले आहे.
आमदार जानकर म्हणाले की, ” नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जवळपास १५० मतदारसंघात गडबड झालेली आहे. याची सखोल चौकशी केल्यास अजित पवारही (Ajit Pawar) २० हजार मतांनी पराभूत असल्याचे दिसून येते.अजित पवार यांना एक लाख ८० हजार मते मिळालेली आहेत. त्यापैकी दोनास एक असे सूत्र वापरले गेले आहे. त्यामुळे युगेंद्र पवार यांना ८० हजार अधिक ६० अशी एक लाख ४० हजार मते मिळालेली असून अजित पवार केवळ १ लाख २० हजार मतांवरती राहतात”, असे त्यांनी म्हटले.
तसेच “या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे केवळ १२ आमदार निवडून आलेले आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे केवळ १८ आमदार (MLA) निवडून आलेले आहेत. तसेच भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे महायुतीची एकूण निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या १०७ एवढी होते, तर दोन-तीन अपक्ष मिळून ते ११० पर्यंतच पोहोचतात. यासंदर्भात मी सर्व मतदारासंघाचा बारकाईने अभ्यास केला आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये गडबड होत असून याची प्रक्रिया मी राहुल गांधी, शरद पवार आणि निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देणार आहे”, असे आमदार उत्तम जानकर म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “बारामतीसह (Baramati) मंत्री जयकुमार गोरेंच्या मतदारसंघात एकास ५ अशी ईव्हीएमची सेटिंग करण्यात आली होती. त्यांना १ लाख ३ हजार मते असून त्यांची जवळपास ३० हजार मते विरोधी उमेदवारांची आहे.त्यामुळे समोरचा उमेदवार १३ हजार मतांनी पडला आहे. त्यामुळे हे ईव्हीएम सरकार असून या सरकारने राजीनामा द्यायला हवा. तसेच सरकार राजीनामा द्यायला तयार नसेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. माझ्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतली पाहिजे” असेही आमदार जानकरांनी म्हटले.