मुंबई । Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणातील अंतर्गत धुसफूस आणि सत्तेचे डावपेच आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचले आहेत. सध्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे ‘ऑपरेशन टायगर’ची. सूत्रांनी दिलेल्या खळबळजनक माहितीनुसार, शिवसेनेत (ठाकरे गट) आणखी एक मोठी फूट पाडण्यासाठी आवश्यक असलेला ६ खासदारांचा जादूई आकडा सोमवारी पूर्ण झाला आहे.
आगामी १९ जून रोजी म्हणजेच शिवसेनेच्या वर्धापदिनी हे ६ खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. या संभाव्य महाफुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आणि टोकदार शब्दांत हल्लाबोल केला आहे.
६ खासदारांच्या फुटीच्या वृत्तावर भाष्य करताना सुषमा अंधारे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तुलना ‘भस्मासुरा’शी केली. त्या म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस, तुम्ही तुमच्या एका मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी असा एक भस्मासूर जन्माला घातला आहे, ज्याची ताकद आता इतकी वाढली आहे की तो स्वतः तुमच्याच डोक्यावर हात ठेवायला मागेपुढे पाहणार नाही. परिस्थिती आता तिथपर्यंत येऊन ठेपली आहे.”
देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीत जाण्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आता लपून राहिलेल्या नाहीत, असा दावा करत अंधारे यांनी भाजपमधील अंतर्गत गटबाजीवरही बोट ठेवले. “फडणवीसांनी दिल्लीत पोहोचू नये, म्हणूनच त्यांच्याच पक्षातील दिल्लीतील बडे नेते त्यांच्या मार्गात ‘लांबसडक स्पीड ब्रेकर’ टाकण्याच्या तयारीत आहेत. हा संपूर्ण खेळ ‘दिल्ली टू दरे’ असा सुरू आहे,” असा टोला त्यांनी लगावला. शिवसेनेच्या वर्धापदिनाला आता अवघे काही तास उरले असताना, पडद्यामागे घडणाऱ्या या वेगवान घडामोडींमुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. हे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होणार की ठाकरे गट यात काही उलथापालथ करणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




