
मुंबई । Mumbai
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू असलेल्या धो-धो पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाले ओसंडून वाहत असून अनेक भागांत पूरपरिस्थिती ओढवली आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या गजबजलेल्या महानगरांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून, पुढील काही दिवस महाराष्ट्रावर पावसाचे सावट कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज सातारा आणि पुणे जिल्ह्यांवर पावसाचे मोठे संकट आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनातर्फे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. नागरिकांना अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुसरीकडे, राज्याची राजधानी मुंबई आणि उपनगरांमध्येही पावसाची संततधार सुरू आहे. मुंबईसाठी आज ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवरील रायगड, पालघर, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्येही आज तुफानी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे जिल्हा आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पुण्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून खडकवासला धरणातून २,७०० क्युसेस वेगाने मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
केवळ पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकणच नव्हे, तर विदर्भातील अनेक भागांतही आज पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, मान्सून आता गुजरात, अरबी समुद्र आणि राजस्थानच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. मान्सूनची ही वाटचाल पाहता, पुढील काही दिवसांत केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात मान्सूनचा जोर कमालीचा वाढणार आहे. राज्यातील या अतिवृष्टीमुळे प्रशासनाने गडकिल्ले, पर्यटन स्थळे आणि धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. एकंदरीत, संपूर्ण राज्य सध्या पावसाच्या छत्राखाली असून प्रशासनाचे परिस्थितीवर बारीक लक्ष आहे.




