मुंबई | Mumbai
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा मागील महिन्यात (दि.२८ जानेवारी) रोजी बारामतीमध्ये विमान अपघातात मृत्यू (Death) झाला. या विमान अपघाताबाबत (Ajit Pawar Accident Plane Crash) राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन व्हीएसआर कंपनीबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे नेते, मंत्री आणि आमदारांनी (MLA) व्हीएसआर कंपनीचे (VSR Company) विमान न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार आणि नेत्यांची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून (Eknath Shinde) मान्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मागील महिन्यात अजित पवार यांचा जो अपघाती मृत्यू झाला, ते विमान व्हीएसआर कंपनीचे होते. लेअर जेट प्रकारातील हे चार्टर्ड विमान होते. केंद्र सरकारची संस्था डीजीसीए आणि व्हीएसआरच्या लेअर जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, आमदार रोहित पवारांनी (MLA Rohit Pawar) मागील काही दिवसांत पत्रकार परिषदा घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी व्हीएसआर कंपनीवर अनेक गंभीर आरोप केले असून, डीजीसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला आहे. बाह्य गुप्तचर संघटनेच्या माध्यमातून चौकशी करा, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी यांनी झारखंडच्या छपरामध्ये अपघातानंतर एआयबीने तात्काळ कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला आणि चौकशी सुरू केली. तितकीच तत्परता व्हिएसआर (VSR) संदर्भात का दाखवली जात नाही? असा संतप्त सवाल केला आहे.
बारामती पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या
आमदार रोहित पवार डीजीसीए विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी आंदोलन करत आहेत. काल त्यांनी मुंबईच्या मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण तिथे गुन्हा दाखल करुन घेतला नाही. यानंतर आज (गुरुवारी) त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बारामती पोलीस स्टेशनबाहेर (Baramati Police Station) ठिय्या मांडला. महाराष्ट्राने या विमान अपघातात आपला एक मोठा नेता गमावला असून, त्यांच्यासारखं नेतृत्व तयार व्हायला बरीच वर्ष लागतात, असे त्यांनी म्हटले.





