पुणे (प्रतिनिधी)
संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापलेला असला तरी, गेल्या दोन दिवसांच्या जोरदार पावसांनंतर आता पावसाने काहीशी ओढ दिली असून जुलैच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे.
मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या ऊन पडले असून, पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र दिसत आहे, कारण सध्या अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कोणतीही मोठी हवामान प्रणाली किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले नाही . मात्र, ही विश्रांती केवळ काही दिवसांची असून, २८ जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होईल आणि १ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान तज्ज्ञ आणि ‘वेगारीज ऑफ वेदर’चे प्रमुख राजेश कपाडिया यांच्या मते, २६ आणि २७ जून रोजी पावसाच्या प्रमाणात मोठी घट होणार आहे . मुंबईत सरासरी २०० ते ३०० मिमी असणारा पाऊस पुढील दोन दिवसांत प्रतिदिन ४० मिमीपर्यंत खाली येऊ शकतो, ज्यामुळे मान्सून काहीसा कमकुवत राहील. मात्र, १ ते ५ जुलै या कालावधीत मुंबईत ३५० ते ४५० मिमी पावसाची शक्यता असल्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे पुनरागमन होईल.
प्रादेशिक अंदाजानुसार, २६ जून रोजी विदर्भातील गोंदिया, भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे, तर राज्याच्या इतर भागांत ‘यलो अलर्ट’सह हलक्या ते मध्यम सरी बरसतील . २७ जूनला विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या भागांत पावसाचे प्रमाण कमी राहून तापमानात काहीशी वाढ होऊ शकते, परंतु कोकण आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा कायम असेल .
२८ आणि २९ जून रोजी पावसाचा जोर पुन्हा वाढण्यास सुरुवात होईल, ज्यामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांचा समावेश असेल. अहिल्यानगर आणि बीडमध्येही पावसाचा अलर्ट देण्यात आला असून उत्तर व दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस अपेक्षित आहे.




