
पुणे | प्रतिनिधी | Pune
फेब्रुवारी महिना संपताच महाराष्ट्रात उन्हाचा कडाका (Summer in Maharashtra) कमालीचा वाढला असून राज्याच्या तापमानाने (Maharashtra Temperature) आता चाळिशीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, विदर्भातील अकोला येथे ३९.३ अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून, हे देशातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. दुसरीकडे, जळगाव (Jalgaon) येथे राज्यातील सर्वात कमी म्हणजेच १५.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये ३६ तर मालेगावमध्ये ३६.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाचा पारा सरासरीपेक्षा तीन ते सहा अंशांनी वाढल्याने संपूर्ण महाराष्ट्र उकाड्याने हैराण झाला आहे. पुणे शहरातही (Pune City) उन्हाची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढली असून लोहगाव परिसरात ३७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, जे सरासरीपेक्षा ३.५ अंशांनी जास्त आहे. सोलापूरमध्ये पारा ३८.४ अंशांवर पोहोचल्याने प्रशासनाने नागरिकांसाठी हिट अलर्ट जारी केला आहे.




