मुंबई | प्रतिनिधी Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्रात आम्ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली. विरोधकांनी आधी याबाबत मोठी वावटळ उठवली. हे भाऊ निवडणुकीपुरतेच पैसे देणार आहेत. नंतर हे पैसे बंद करतील, असा अपप्रचार केला. पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरूच ठेवली. इतकेच नाही तर ती पुढील पाच वर्ष अखंडपणे सुरूच राहणार असून योग्यवेळी या योजनेच्या निधीत आम्ही वाढ करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे बोलताना दिली.
मुलुंड येथील महाकवी कालीदास नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन उत्सवात फडणवीस आज सहभागी झाले होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला. हा केवळ राखीचा धागा नाही, तर प्रेमाचा धागा आहे. बहीण भावावरचे प्रेम यातून व्यक्त होते. या धाग्यातून भाऊ बहिणीच्या रक्षणाची शपथ घेतो. मात्र, आता मी माझ्या बहिणीला इतके सक्षम बनवेन की ती स्वतःचेच नव्हे, तर कुटुंबाचेही रक्षण करू शकेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
मी या कार्यक्रमाला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही तर लाडक्या बहिणींचा देवाभाऊ म्हणून आलो आहे. ज्याच्यामागे एवढया बहिणींचे साकडे, त्याचे कोण काय करू शकेल वाकडे. त्यामुळे अनेकांनी अनेक मनसुबे रचले,षडयंत्र रचली. पण लाडक्या बहिणी पाठिशी होत्या म्हणून आम्ही पुन्हा तुमच्या आशीर्वादाने सत्तेवर आलो, असे ऋणही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.
राज्य सरकारने मुलींसाठी उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत केले आहे, आज ‘केजी टू पीजी’पर्यंत मुली मोफत शिक्षण घेऊ शकतात. यामुळे मुली शिक्षणात मोठी प्रगती करत आहेत. याचे उत्तम उदाहरण विद्यापीठांतील ‘गोल्ड मेडल’ मिळवणाऱ्या मुलींच्या वाढलेल्या संख्येवरुन दिसून येते. आता महिलांची प्रगती होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध मान्यवर उपस्थित होते.




