मुंबई । प्रतिनिधी Mumbai
राज्यात जुगाराचा सुळसुळाट सुरु असून सरकारच त्याला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे राज्य सरकारने रमी खेळण्यासाठी स्वतंत्र धोरण आखावे आणि राज्यातील जनतेने रमी खेळावे यासाठी अध्यादेश काढावा, अशी उपहासात्मक टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर केली.
पावसाळी अधिवेशनात मोबाईलवर रमी खेळतानाचा कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच बाजूंनी टीका होऊ लागली आहे. विरोधी पक्षाने कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर कोकाटे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना कोकाटेंवर निशाणा साधला.
माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळत होते की नव्हते हे झुम करून पाहिले तर कळेल की ते कोणते पत्ते खेळत होते. विधानसभा आणि विधान परिषद सभागृह लोकशाहीचे मंदीर आहे. तेथे रमी खेळणे हे अपवित्र काम कृषिमंत्र्यांनी केले आहे. राज्याचा कृषिमंत्रीच एवढा असंवेदनशील असेल तर शेतकऱ्यांचा वाली कोण? असा सवाल दानवे यांनी केला.





