मुंबई । Mumbai
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. देशमुखांना न्याय मिळावा अशी त्यांची सातत्याने मागणी आहे. या प्रकरणात आता त्यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले असून, आरोपींविरुद्ध कठोर कारवाई व्हावी यासाठी सरकारवर दबाव वाढवत आहेत.
जरांगे पाटील यांनी याप्रकरणी बोलताना म्हटले आहे, “संतोष देशमुख यांचे मारेकरी अद्याप फरार आहेत. ते नक्की कोणाच्या घरी लपले होते? हे संपूर्णपणे चार्जशीटमध्ये स्पष्ट झाले पाहिजे. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हे शोधण्यासाठी सखोल चौकशी व्हावी. तसेच, आरोपींना मदत करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना अजूनही निलंबित का करण्यात आले नाही? तसेच, आरोपींच्या संपत्तीबाबत तपास का झाला नाही?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत असेही सांगितले की, “वाल्मिक कराडला काहीही झाले नसताना त्याला आयसीयूमध्ये का दाखल करण्यात आले? बाकीचे सहआरोपी पकडले गेले नाहीत, त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना सोडून दिले. त्यामुळे सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे का? सरकार पुरावे नष्ट करून आरोपींना सुटका करण्याच्या तयारीत आहे का?” असे सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारची कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला आहे.
जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, “या प्रकरणातील आरोपी करोडोंच्या आर्थिक गैरव्यवहारात सामील आहेत. इतकेच नव्हे तर, जेव्हा ते पळून जात होते, त्यावेळी ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसले. तरीही, त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही. दररोज नवीन पुरावे समोर येत आहेत. हेच लोक खंडणी मागत होते आणि हेच लोक खून करत आहेत,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
याशिवाय, जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्धार केला होता. मात्र, राज्य सरकारला त्यांच्या इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या उपोषणाला १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. “सरकारला पुरेसा वेळ दिला पाहिजे. जर त्यांनी योग्य ती पावले उचलली नाहीत, तर मी पुन्हा उपोषणाला बसेन,” असे त्यांनी जाहीर केले आहे.