मुंबई । Mumbai
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार करत मनोज जरांगे पाटील यांनी २७ ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या मोर्चामध्ये मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी समाजाला केले आहे.
सरकारकडून या मोर्चा थांबवण्यासाठी हालचाली सुरू असून, वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी सोमवारी आंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली. याआधी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी देखील मोर्चा पुढे ढकलावा असे आवाहन केले होते. मात्र जरांगे यांनी या सर्व विनंत्या फेटाळून लावत ठरल्याप्रमाणे २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शांततेत मोर्चा निघेल, असा ठाम पवित्रा जाहीर केला आहे.
जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “सरकारला आम्ही स्पष्ट सांगितले आहे, हजार रस्ते आहेत त्यापैकी आम्हाला एक रस्ता द्या. आम्ही ठाम आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. या मागणीवर आम्ही कुठलाही तडजोड करणार नाही.” तसेच सरकारकडून ३ महिन्यांचा वेळ मागण्यात येत असला तरी समाजाला आता आणखी प्रतीक्षा मान्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “मी चार महिन्यांपूर्वीच या तारखेची घोषणा केली होती. दोन महिन्यांपूर्वी आम्ही फडणवीसांना सांगितले होते की मुंबईकडे यायचे नाही, परंतु आमच्या मागण्यांची अंमलबजावणी २६ ऑगस्टच्या आत करावी. आम्ही गणेशभक्त आहोत हेही आम्ही सांगितले. मात्र सरकारने गांभीर्याने घेतले नाही. आता कायदेशीरदृष्ट्या मराठ्यांचा हक्क मान्य झाला आहे, हे सरकारच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता विविध कारणे पुढे करून मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
सरकारकडून राजकीय आणि प्रशासनिक पातळीवर केलेल्या प्रयत्नांनंतरही जरांगे आपला निर्धार कायम ठेवत आहेत. त्यांच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.




