Sunday, June 14, 2026
Homeमहाराष्ट्रManoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार; जरांगे पाटलांचा एल्गार,...

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार; जरांगे पाटलांचा एल्गार, उद्या मोठी घोषणा होणार?

मुंबई । Mumbai

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात गेल्या दोन-तीन वर्षांपासून ज्या नावाची चर्चा सुरू आहे, ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील. आतापर्यंत अनेक आंदोलनांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणाऱ्या जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याचा ठपका ठेवत, जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून सरकारची झोप उडवण्याचा निर्णय घेतला असून, उद्या अंतरवाली सराटीतून आंदोलनाची नवी दिशा स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांत जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनांनी सरकारला नमते घेण्यास भाग पाडले होते. मात्र, वेळोवेळी दिलेली आश्वासने हवेतच विरल्याचा आरोप आता मराठा समाजाकडून होत आहे. “आठ महिने उलटून गेले तरी कुणबी प्रमाणपत्रे का मिळाली नाहीत? सातारा संस्थानचा जीआर एका महिन्यात काढण्याचे वचन दिले होते, त्याचे काय झाले? आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन पाळले का?” असे तिखट प्रश्न विचारत मनोज जरांगे यांनी सरकारला धारेवर धरले आहे.

जरांगे पाटील यांनी केवळ सरकारवरच नाही तर प्रशासकीय यंत्रणेवरही निशाणा साधला आहे. “शिंदे समितीची मुदत केवळ कागदावर वाढवली जात आहे, प्रत्यक्षात ही समिती जुने रेकॉर्ड शोधण्यात रस दाखवत नाहीये,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. हैदराबाद गॅझेट आणि कुणबी नोंदींच्या मुद्द्यावर सरकार जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. उद्या सकाळी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेत आंदोलनाची नेमकी तारीख आणि स्वरूप निश्चित केले जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी काळात मराठा समाज पुन्हा एकदा मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने कूच करण्याची शक्यता आहे.

आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढवला. नेकनूर येथील घटनेचा संदर्भ देत त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या वाढत्या संघर्षामुळे येणाऱ्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्याच्या घोषणेनंतर राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेसोबतच राजकीय गणितेही बदलण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष उद्या सकाळी अंतरवाली सराटीतून येणाऱ्या शब्दांकडे लागले आहे.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...