
जालना । Jalana
मराठा आरक्षण उपसमितीच्या निर्णयांवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या राजकीय वाटचालीचा खरपूस समाचार घेत जोरदार पलटवार केला आहे. “या वयात भुजबळांनी स्वतःचे राजकारण पाहावे आणि पुतण्याला खासदार कसे करता येईल, याकडे लक्ष द्यावे,” असा जळजळीत टोला जरांगे यांनी लगावला आहे.
जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर राजकीय संधानाचा आरोप केला. “कधी महाविकास आघाडी, कधी महायुती तर कधी अजित पवारांसोबत; भुजबळांनी केवळ स्वतःच्या सोयीचे राजकारण केले आहे,” अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्र सदन आणि ओबीसी महामंडळाच्या मुद्द्यांचा पुनरुच्चार करत त्यांनी, “ओबीसी समाजाने आता भुजबळांना पूर्णपणे ओळखले आहे. म्हातारपणात ते समंजस भूमिका घेतील असे वाटले होते; पण बळ गेले तरी यांचा पीळ गेला नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
दुसरीकडे, छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याच्या प्रक्रियेवर आणि जात पडताळणी समितीच्या कामकाजावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. जात पडताळणी समितीवर कोणताही राजकीय दबाव आणला जाऊ नये, अशी ठाम भूमिका भुजबळांनी मांडली आहे. “काही ठिकाणी दाखल्यांमध्ये कथित फेरफार करून प्रमाणपत्रे मिळवली जात आहेत. मुंबईतील काही नगरसेवकांच्या जात पडताळणीचा मुद्दा असो की कुणबी-मराठा मंत्रालयातील चर्चा, या सर्वांमुळे मूळ ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये,” असे म्हणत त्यांनी राज्य सरकारकडून स्पष्टतेची मागणी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात ज्या मराठा कुटुंबांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत, त्यांना तातडीने प्रमाणपत्रे द्यावीत या प्रमुख मागणीसाठी जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत अमरण उपोषणावर ठाम आहेत. राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या शिष्टमंडळाने सकारात्मक चर्चा केली असली, तरी निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.




